'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 07:27 IST2026-04-25T07:26:31+5:302026-04-25T07:27:29+5:30
आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभेतील १० पैकी ७ खासदारांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभेतील १० पैकी ७ खासदारांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आपला खूप मोठा राजकीय धक्का बसला आहे. आपचे खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासह सात जणांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा शुक्रवारी राजीनामा दिला.
पक्षांतरासाठी आवश्यक दोन तृतीयांश खासदार या गटाकडे असल्याने त्यांची ही कृती अवैध ठरणार नाही व त्यांना अपात्रही ठरविले जाणार नाही. या पक्षांतराच्या घटनेमुळे भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेचा विश्वासघात केला आहे, असा आरोप दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला. आपल्या निर्णयाबद्दल माहिती देण्यासाठी चड्ढा, मित्तल व पाठक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये आपच्या कारभारावर टीक करत चढ्ढा यांनी आम्ही सात जण पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले.
पक्ष का सोडताय? हे सांगताना राघव चढ्ढा म्हणाले...
मी माझे रक्त आणि घाम तसेच माझ्या तरुणाईपैकी १५ वर्षांचा कालावधी देऊन उभा केलेला आप पक्ष आपल्या तत्त्व, मूल्ये, मूळ नैतिक भूमिकेपासून पूर्णपणे दूर गेला आहे. राज्यसभा खासदार राघव चड्ढा म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आप पक्ष आता देशासाठी नाही, तर स्वतःच्या फायद्यासाठी काम करीत आहे. गेल्या काही वर्षांत मला, असे वाटू लागले होते की मी योग्य व्यक्ती असलो तरी आपसारख्या चुकीच्या पक्षात कार्यरत आहे. त्यामुळेच मी आपपासून दूर जाण्याचा आणि जनतेची अधिक जवळून सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा खासदार संदीप पाठक म्हणाले की, आपमधून बाहेर पडावे लागण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल, असे कधी वाटलेही नव्हते. गेली १० वर्षे मी या पक्षाशी जोडलेला होतो.
वादाचे मुद्दे काय होते?
राघव चड्ढा: हे 'आप'चे अत्यंत तरुण आणि प्रमुख चेहरा होते. पंजाबमधील पक्षाच्या विजयात आणि रणनीतीत त्यांची भूमिका महत्त्वाची होती. राज्यसभेत आपच्या उपनेतेपदावरून राघव चड्ढा यांना नुकतेच हटवण्यात आले होते आणि त्यांच्या जागी मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली होती.
अशोक मित्तल : हे 'लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी'चे संस्थापक आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. काही दिवसांपूर्वीच 'आप'ने त्यांची राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती केली होती. १५ एप्रिल रोजी ईडीने पंजाबमध्ये आपचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्याशी संबंधित व्यावसायिक संस्थांवर फेमाच्या चौकशीअंतर्गत छापे टाकले होते. तेही भाजपमध्ये सामील झाले आहेत.
स्वाती मालीवाल : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या कथित हल्ल्याच्या घटनेत पक्षाने आपली बाजू न घेतल्याने आणि आरोपीला संरक्षण दिल्याचा आरोप करत मालीवाल यांनी पक्षाविरुद्ध भूमिका घेतली होती.
अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया
आमच्या सात राज्यसभा खासदारांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. या सर्व कृत्यांमागे असलेल्या भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेचा विश्वासघात केला आहे, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमख अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.
पक्षांतरबंदी कायद्याचे गणित काय सांगते?
एखाद्या पक्षात फूट मान्य होण्यासाठी आणि अपात्रतेपासून वाचण्यासाठी राज्यसभेत त्या पक्षाच्या किमान दोन-तृतीयांश (२/३) सदस्यांचा पाठिंबा लागतो. आपचे राज्यसभेतील एकूण सदस्य = १० किमान ७ खासदार एकत्र आले, तरच ही फूट वैध ठरेल. चड्ढा यांना ७/१० खासदारांचा पाठिंबा मिळाल्यासच, पक्षांतर विरोधी कायद्यापासून वाचत भाजपमध्ये जाणे शक्य होईल. म्हणजेच, आपच्या राज्यसभा गटातील सुमारे ७०% सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे.