मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 08:04 IST2026-04-25T08:01:38+5:302026-04-25T08:04:34+5:30
हवेतील बाष्प वाढल्याने मुंबईकर पुन्हा घामाघूम होऊ लागले असून, दिवसाचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर रात्रीचे किमान तापमान २६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: हवेतील बाष्प वाढल्याने मुंबईकर पुन्हा घामाघूम होऊ लागले असून, दिवसाचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर रात्रीचे किमान तापमान २६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. रविवारपर्यंत कमाल व किमान तापमान स्थिर राहणार असून, हवेतील बाष्पही कायम राहणार असल्याने मुंबईकरांच्या त्रासात भरच पडणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्रही तापला असून, शुक्रवारी येथे अकोला ४५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य भारतासह महाराष्ट्रातील अंतर्गत भागांमध्ये काही दिवसांत हवामानात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यानंतर म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मध्य भारतातील बहुतांश भागांमध्ये, विशेषतः महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात, रात्रीच्या तापमानात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर हळूहळू किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.मे महिन्याच्या मध्यापर्यंत कोकण पट्ट्यात तापमानाचा दिलासा मर्यादित राहण्याची शक्यता आहे.
रविवारपर्यंत अवकाळीची शक्यता
२६ एप्रिलपर्यंत कोकण व मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. महामुंबईतही पाऊस अपेक्षित आहे. रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली असून, दिवसा मुंबईत हवेत अधिक बाष्प आहे. त्यामुळे घाम येण्याचे प्रमाण अधिक असून, रविवारपर्यंत असेच हवामान राहील, असे हवामान अभ्यासक अथ्रेय शेटटी यांनी सांगितले.