कोलकात्यात हायव्होल्टेज ड्रामा; ममता बॅनर्जींकडून ईडीविरोधात FIR वर FIR; प्रकरण कोर्टात पोहोचले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 10:04 IST2026-01-09T10:03:46+5:302026-01-09T10:04:16+5:30
Mamata Banerjee vs ED Kolkata: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांपूर्वी ईडी आणि ममता बॅनर्जी यांच्यात संघर्ष पेटला आहे. I-PAC वरील छाप्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज कोलकात्यात भव्य रॅली काढणार आहेत. वाचा संपूर्ण घडामोड.

कोलकात्यात हायव्होल्टेज ड्रामा; ममता बॅनर्जींकडून ईडीविरोधात FIR वर FIR; प्रकरण कोर्टात पोहोचले...
कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी टीएमसीसाठी काम करणारी निवडणूक रणनीतीकार संस्था 'I-PAC' च्या कार्यालयावर आणि संचालक प्रतीक जैन यांच्या निवासस्थानावर टाकलेल्या धाडीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आक्रमक झाल्या आहेत. या कारवाईच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी आज कोलकात्याच्या रस्त्यावर उतरून भव्य निषेध रॅली काढणार आहेत.
गुरुवारी कोळसा घोटाळा प्रकरणाच्या तपासासाठी ईडीने कोलकाता आणि दिल्लीत १० हून अधिक ठिकाणी छापेमारी केली. यादरम्यान ममता बॅनर्जी स्वतः प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी पोहोचल्या आणि बऱ्याच फाईल्स ताब्यात घेतल्या होत्या. ईडी काहीही करू शकली नव्हती. आपल्या उमेदवारांच्या याद्या, माहिती मिळविण्यासाठी भाजपाने ईडीच्या मदतीने हा छापा टाकल्याचा आरोप ममता यांनी केला होता.तर ईडीने आरोप केला आहे की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तपासात अडथळा आणला आणि तिथून काही महत्त्वाची कागदपत्रे व 'डेटा फाईल्स' सोबत नेल्या आहेत. या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात बंगालमध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ममता बॅनर्जींचा 'थेट' आरोप
"भाजप आणि अमित शाह केंद्रीय यंत्रणांचा वापर करून तृणमूल काँग्रेसची निवडणूक रणनीती चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. आय-पॅककडे आमचा गोपनीय डेटा आणि उमेदवारांची यादी आहे, ती हस्तगत करण्यासाठी ही धाड टाकण्यात आली," असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्यांनी याला 'राजकीय सूडबुद्धी' असे संबोधले असून याविरोधात पोलीस स्थानकात एफआयआर देखील दाखल केली आहे.
कलकत्ता हायकोर्टात 'आमनेसामने'
हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. ईडीने कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेत ममता बॅनर्जींवर तपासात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसने ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत जप्त केलेले दस्तऐवज परत करण्याची मागणी केली आहे. आज होणाऱ्या या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.