भारत-पाक २००३ च्या शस्त्रसंधी कराराचे पालन करणार

By Admin | Updated: September 23, 2015 00:47 IST2015-09-23T00:47:36+5:302015-09-23T00:47:36+5:30

सीमेवरील गोळीबाराचे लक्ष्य ठरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत भारत आणि पाकिस्तानच्या लष्कराने चिंता जाहीर केली

The Indo-Pak 2003 Arms Agreement will be followed | भारत-पाक २००३ च्या शस्त्रसंधी कराराचे पालन करणार

भारत-पाक २००३ च्या शस्त्रसंधी कराराचे पालन करणार

नगरोटा (जम्मू-काश्मीर) : सीमेवरील गोळीबाराचे लक्ष्य ठरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत भारत आणि पाकिस्तानच्या लष्कराने चिंता जाहीर केली असून उभयतांमध्ये इ. स.२००३ च्या शस्त्रसंधी करारातील सिद्धांतांचे तंतोतंत पालन करण्यावर
सहमती झाली असल्याची माहिती एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिली.
१६ व्या कोरचे जनरल आॅफिसर कमांडिंग (जीओसी) लेफ्टनंट जनरल आर.आर. निंभोरकर यांनी मंगळवारी येथे एका समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर शांतता आणि सौहार्द राखण्याच्या दृष्टीने विविध यंत्रणा स्थापन केल्या जाणार आहेत. दोन्ही बाजूंचे याशिवायही अनेक मुद्यांवर एकमत झाले आहे. पूंछमध्ये सोमवारी झालेल्या ध्वज बैठकीतील निष्कर्षांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
आम्ही काही कठोर संदेश देण्याच्या हेतूने ध्वज बैठकीला गेलो नव्हतो असे स्पष्ट करताना निंभोरकर म्हणाले, या बैठकीचा मुख्य उद्देश सीमेवर शांतता आणि सौहार्द कायम कसे राखता येईल याबाबत उपाययोजना करणे हा होता. कारण गोळीबारात दोन्ही देशांचे नागरिक ठार झाले आहेत.
नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. बैठकीतील निर्णयाबाबत पाकिस्तानवर विश्वास ठेवता येणार काय, असा प्रश्न विचारला असता ते आश्वासन पाळणार नाहीत असे वाटत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये पाकसमर्थित दहशतवाद आणि घुसखोरीचा
मुद्दा मात्र या बैठकीत चर्चेला आला नाही.(वृत्तसंस्था)

Web Title: The Indo-Pak 2003 Arms Agreement will be followed