“जहाजांच्या सुरक्षिततेबाबत इराणशी चर्चा झाली, पण...”; होर्मुझबाबत भारताने भूमिका स्पष्ट केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 16:50 IST2026-03-12T16:48:26+5:302026-03-12T16:50:22+5:30
America Israel Iran War: भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची यांनी तीन वेळा चर्चा केली आहे.

“जहाजांच्या सुरक्षिततेबाबत इराणशी चर्चा झाली, पण...”; होर्मुझबाबत भारताने भूमिका स्पष्ट केली
America Israel Iran War: अमेरिका-इराण युद्धामुळे देशभरात गंभीर गॅस टंचाई निर्माण झाली असून, देशभरात गॅस सिलिंडरसाठी सर्वसामान्य नागरिकांनी भर उन्हात रांगा लावल्या. केंद्र सरकारने मात्र देशात एलपीजी सिलिंडरची कोणतीही कमतरता नसून ग्राहकांनी घाबरून जाऊन आगाऊ बुकिंग करण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इराणी परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी साधलेल्या संवादानंतर इराणने भारताच्या जहाजांना स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून प्रवासाची मुभा दिली असल्याचे सांगितले जात होते. परंतु, याबाबतचे वृत्त इराणने फेटाळल्याचे म्हटले आहे. यातच आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
होर्मुझ समुद्रधुनीतून तेल पुरवठा खंडित झाल्यामुळे ऊर्जा संकटाचा धोका निर्माण झाला आहे. भारत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत भारताची भूमिका स्पष्ट केली. रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, हे संकट सुरू झाल्यापासून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची यांनी तीन वेळा चर्चा केली आहे. यातील शेवटची चर्चा ऊर्जा आणि जहाजांच्या मुद्द्यांवर केंद्रित होती. परंतु, याबाबत अधिक तपशील सांगणे घाईचे ठरेल, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
इराणमध्ये सुमारे ९ हजार भारतीय आहेत
जयस्वाल यांनी पुढे सांगितले की, इराणमध्ये सुमारे ९ हजार भारतीय आहेत, ज्यात विद्यार्थी, व्यापारी, खलाशी आणि यात्रेकरूंचा समावेश आहे. भारत सरकारने २४ फेब्रुवारी रोजी एक सूचना जारी केली होती, त्यानंतर अनेक भारतीय आधीच परत आले. उर्वरित लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. इराणने २० फेब्रुवारी रोजी भारतीय बंदरांवर तीन जहाजांना लॉक करण्याची परवानगी मागितली होती. भारताने १ मार्च रोजी ही परवानगी दिली. यापैकी एक जहाज ४ मार्च रोजी कोची येथे पोहोचले आणि त्याचे कर्मचारी सध्या भारतीय नौदलाच्या देखरेखीत आहेत.
दरम्यान, इराण भारतीय जहाजांना होर्मुझ मार्गावरून जाण्याची परवानगी देत असल्याच्या वृत्तांवर भाष्य करणे आताच घाईचे ठरेल. दोन्ही देशांनी सागरी सुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षेवर चर्चा केली आहे, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केल्यापासून भारत सरकारने अनेक भारतीयांना, विशेषतः विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. दूतावास भारतीय समुदायाशी सतत संपर्कात आहे आणि इराणमधून भारतात परत येऊ इच्छिणाऱ्यांना परत आणण्याची व्यवस्था केली जात आहे.