‘मी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला, म्हणूनच माझ्या पीएची हत्या केली’;भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 10:14 IST2026-05-08T10:11:13+5:302026-05-08T10:14:39+5:30
भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे खळबळजनक आरोप, तृणमूलची सीबीआय चौकशीची मागणी

‘मी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला, म्हणूनच माझ्या पीएची हत्या केली’;भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे खळबळजनक आरोप
Marathi News : कोलकाता/नंदीग्राम : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेला हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. "मी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला, म्हणून माझ्या पीएची हत्या करण्यात आली," असा खळबळजनक आरोप अधिकारी यांनी केला आहे.
अधिकारी यांनी म्हटले की, ही हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने आणि नियोजनबद्ध रितीने करण्यात आली आहे. भवानीपूर आणि नंदीग्राममधील पराभवाचा वचपा काढण्यासाठीच ही हत्या करण्यात आली असावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
या हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे अधिकारी यांनी म्हटले आहे. याबाबत आपण पोलिस महासंचालकांशी चर्चा केली असल्याचे सांगून लवकरच हल्लेखोरांना अटक केली जाईल, असे सुवेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे.
चंद्रनाथ रथ यांच्या हत्येच्या निषेधार्थ रास्ता-रोको
चंद्रनाथ रथ यांच्या हत्येच्या निषेधार्थ गुरुवारी पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यात सोलबोनी येथे रास्ता रोको करण्यात आला.
‘ममता बॅनर्जी यांच्या पराभवाचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आली असल्याचा दावा चंद्रनाथ यांच्या मातोश्रींनी केला आहे. काही नेत्यांनी आधीच धमक्या दिल्या होत्या की ४ तारखेनंतर कोणीही वाचवू शकणार नाही," असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या हत्येचा निषेध करून तृणमूल काँग्रेसने राज्यात नेहमीच रक्तपात आणि हिंसाचाराला पाठबळ दिले असल्याचा आरोप केला.
ही त्या नियोजनपूर्वक करण्यात आली असल्याचा दावा बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष समीक भट्टाचार्य यांनी केला.
भाजप कार्यकर्त्याला गोळी घातली
बसीरहाटमध्ये भाजप कार्यकर्ते रोहित रॉय यांच्यावर बुधवारी गोळीबार झाला. त्यांच्या पोटात गोळी लागली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उत्तर-२४परगाना जिल्ह्यातील पनिहाटीमध्ये कथितरीत्या एका बॉम्बस्फोटात भाजपचे पाच कार्यकर्ते जखमी झाले. सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहायक रथ यांच्या हत्येनंतर काही वेळाने हा स्फोट झाला.
तृणमूल काँग्रेसने सर्व आरोप फेटाळले
तृणमूल काँग्रेसने या हत्येत आपल्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. उलट, या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी टीएमसीने केली आहे. बुधवारी रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात पक्षाने म्हटले आहे की, "आम्ही चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा निषेध करतो आणि या प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी व्हावी, जेणेकरून सत्य समोर येईल."