Mallikarjun Kharge : "फारुख अब्दुल्लांचा जीव घेण्याचा सरकारचा हेतू?", राज्यसभेत खरगेंचा सवाल, नड्डांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 14:53 IST2026-03-12T14:51:47+5:302026-03-12T14:53:01+5:30
Mallikarjun Kharge And JP Nadda : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्यावर काल रात्री झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा मुद्दा गुरुवारी संसदेतही गाजला.

Mallikarjun Kharge : "फारुख अब्दुल्लांचा जीव घेण्याचा सरकारचा हेतू?", राज्यसभेत खरगेंचा सवाल, नड्डांचा पलटवार
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्यावर काल रात्री झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा मुद्दा गुरुवारी संसदेतही गाजला. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हा विषय उपस्थित करत केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. तसेच त्यांनी सरकारच्या हेतूवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावर सभागृह नेते जे.पी. नड्डा यांनी ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं सांगत या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी विरोधी पक्षनेते खरगे यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला.
राज्यसभेत शून्यप्रहरादरम्यान मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, "काल जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्यावर हल्ला झाला. थोडा उशीर झाला असता, तर त्यांचा जीवही जाऊ शकला असता." या घटनेला केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे.
खरगे यांनी टीका करताना म्हटलं की, जम्मू-काश्मीरचे नागरिक सुरक्षित नाहीत. त्यांनी सवाल केला की, "काय फारुख अब्दुल्ला यांचा जीव घेणं हा सरकारचा हेतू आहे का? अब्दुल्ला यांच्या स्थानिक सुरक्षारक्षकांनीच त्यांचा जीव वाचवला." याला उत्तर देताना जे.पी. नड्डा म्हणाले की, "ही एक गंभीर घटना आहे. सरकारच्या वतीने मी आश्वस्त करतो की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल."
नड्डा पुढे म्हणाले की, "गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून त्याच्या हेतूचा शोध घेतला जात आहे. मात्र, अशा गंभीर घटनेकडे राजकीय चष्म्यातून पाहणं आणि तिला राजकीय अँगल देणं योग्य नाही. केवळ स्टेटहूडमुळे हे घडलं या निष्कर्षावर येणं चुकीचं आहे." सरकारच्या हेतूवर शंका घेणं हे काँग्रेसच्या मानसिकतेचं दर्शन घडवतं आणि ते निंदनीय आहे अशी टीकाही त्यांनी केली. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूबाबत काँग्रेसने आजपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, असा टोलाही नड्डा यांनी लगावला.