नवी दिल्ली : देशात एकाच दिवसात कोरोनाचे २८,७०१ नवे रुग्ण आढळून आले असून ही विक्रमी वाढ आहे. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ८ लाख ७८ हजारांवर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासांत आणखी ५०० जण या आजाराने मरण पावल्याने एकूण बळींची संख्या २३,१७४ झाली आहे.
६३.०१ रुग्ण बरे झाले
कोरोनाच्या आजारातून उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या ५,५३,४७० इतकी झाली आहे. तर ३,०१,६०९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६३.०१ टक्के आहे.
लॉकडाऊनमध्ये वाढ
देशात कोरोनाचे २६ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तेरा दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत तीन लाखांनी वाढ झाली. कोरोनाच्या फैलाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आसाम आदी राज्यांनी लॉकडाऊनची मुदत वाढविली आहे.
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी देशभरात कोरोनाच्या 219103 चाचण्या पार पडल्या. त्यामुळे या दिवसापर्यंत राष्ट्रीय स्तरावर कोरोनाच्या चाचण्यांची एकूण संख्या १,१८,०६,२५६ झाली आहे.
दिलासा : मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ७० टक्के !
मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ७० टक्क्यांवर पोहोचला आहे. तर ५ ते १२ जुलैपर्यंत कोविड वाढीचा दर १.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्ण दुपटीचा दर ५१ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत दिवसभरात १ हजार १५८ कोरोनाबाधित रुग्ण तर ४७ मृत्यूंची नोंद झाली. मुंबईत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९४,१४६ झाली असून मृतांचा आकडा ५,३३५ झाला आहे. आतापर्यंत शहर, उपनगरातील ६५,६२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात दिवसभरात ६,४९७ नवे कोरोना रुग्ण
मुंबई : राज्यात सोमवारी दिवसभरात ६ हजार ४९७ रुग्ण वाढले आणि १९३ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ६० हजार ९२४ झाली असून बळींचा आकडा १० हजार ४८२ झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के तर मृत्यूदर ४.०२ टक्के झाला आहे. राज्यात सोमवारी १९३ मृत्यूंची नोंद झाली आहे.