घुसखोरांच्या संरक्षणासाठी काँग्रेस कायदा करण्याच्या तयारीत : मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 10:42 IST2026-04-02T10:41:37+5:302026-04-02T10:42:38+5:30
बहुसंख्याकांना अल्पसंख्याक बनवणे हा काँग्रेसचा उद्देश

घुसखोरांच्या संरक्षणासाठी काँग्रेस कायदा करण्याच्या तयारीत : मोदी
गोगमुख : सत्तेत आल्यानंतर घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी कायदा करण्याची तयारी काँग्रेसने सुरू केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मात्र, भाजप व त्याचे मित्रपक्ष काँग्रेसचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाहीत. धेमाजी जिल्ह्यातील गोगमुख येथील प्रचारसभेला संबोधित करताना मोदींनी घुसखोरांच्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षावर टीकेची झोड उठवली.
बहुसंख्याक समाजाला अल्पसंख्याक बनवणे व घुसखोरांची 'व्होट बँक' तयार करणे हा काँग्रेसचा उद्देश आहे. त्यांना संरक्षण देण्यासाठी एक नवीन कायदा आणण्याची भाषा काँग्रेस नेते उघडपणे करत आहेत. एवढचे नाही तर त्यांनी उघडपणे घुसखोरांचे समर्थन करणे सुरु केले आहे, असे ते म्हणाले. फाळणीच्या काळात मुस्लीम लीगने देशाच्या विभाजनाचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाच्या पाठीतही खंजीर खुपसला असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात भाजप पुन्हा सत्तेत आला तर आम्ही समान नागरी कायदा लागू करण्यासोबतच आसामची अस्मिता जपण्यासाठी 'सहाव्या अनुसूची' अंतर्गत आदिवासींचे संरक्षण करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
१० वर्षांत सेवा, सुशासन
भाजपने १० वर्षांच्या राजवटीने आसाममध्ये 'सेवा', 'सुशासन' या नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. आधुनिक सुविधांची उभारणी केवळ भाजपच्या नेतृत्वाखालील 'एनडीए'च करू शकते, असे सर्व जण म्हणत आहेत. भाजप आसामच्या निवडणुकांमध्ये विजयाची 'हॅट्रिक' साधेल, तर काँग्रेस पराभवांचे 'शतक' पूर्ण करेल, असे नमूद करत भाजप पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास मोर्दी यांनी व्यक्त केला.