Pawan Khera : "मणिपूरकडे दुर्लक्ष..."; काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला, बुक केलं फ्लाईट तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 14:07 IST2026-02-14T14:06:37+5:302026-02-14T14:07:17+5:30
Pawan Khera And Narendra Modi : आसाम दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे.

Pawan Khera : "मणिपूरकडे दुर्लक्ष..."; काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला, बुक केलं फ्लाईट तिकीट
आसाम दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरकाँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते पवन खेडा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत पंतप्रधानांनी हिंसाचार होत असेलल्या मणिपूरला भेट द्यावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
पवन खेडा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, ज्या राज्यांत निवडणुका असतात, ती राज्य सरकारची पहिली प्राथमिकता बनतात, परंतु मणिपूरकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये. मणिपूर मे २०२३ पासून हिंसाचाराचा सामना करत आहे आणि तेथील परिस्थिती अजूनही पूर्णपणे सामान्य झालेली नाही.
त्यांनी पुढे असंही म्हटलं की, पंतप्रधान सध्या आसाममध्ये आहेत आणि मणिपूर तिथून फार लांब नाही. अशा परिस्थितीत त्यांनी तिथे जाऊन लोकांची भेट घेतली पाहिजे. खेडा यांच्या मते, पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे मणिपूरच्या जनतेला विश्वास मिळू शकतो. आपल्या पोस्टसोबत गुवाहाटी ते इम्फाळच्या फ्लाईट तिकिटाचा फोटोही शेअर केला आहे.
Dear PM @narendramodi,
— Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) February 14, 2026
We understand that poll-bound states are always your top priority. But Manipur should not be abandoned. The state has been burning since 2023 - and it is burning again.
You are already in Assam today. Manipur is just an hour away. Please go there as well.… pic.twitter.com/kW2zBJICSS
पंतप्रधानांच्या सोयीसाठी तिकीट बुक करण्यात आलं आहे आणि त्यांना फक्त विमानात बसायचं आहे. आपल्याकडे पंतप्रधानांचा नंबर नसल्यामुळे आपण हे तिकीट सोशल मीडियावर शेअर करत आहोत, असंही त्यांनी नमूद केलं. खेडा यांनी केंद्र सरकारच्या ‘PM CARES’ फंडाचा उल्लेख करत टोला लगावला. पंतप्रधानांनी मणिपूरला जाऊन हे दाखवून दिलं पाहिजे की त्यांना खरोखरच राज्याची काळजी आहे असंही म्हटलं.
मणिपूरमध्ये २०२३ पासून हिंसाचार
मणिपूरमध्ये मे २०२३ पासून हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. विरोधक सातत्याने केंद्र सरकारला यावरून प्रश्न विचारत आहेत. दुसरीकडे परिस्थिती सुधारण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने पावले उचलली जात असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
सोशल मीडियावर चर्चांना उधाण
पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) अद्याप या विधानावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या संपूर्ण प्रकरणावरून सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. जिथे काँग्रेस समर्थक याला मणिपूरची उपेक्षा म्हणत आहेत, काही जण याला केवळ 'राजकीय स्टंट' असल्याचं म्हणत आहेत.