DMK MP Kanimozhi Karunanidhi: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दक्षिण भारताच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. अभिनेता थलपती विजय याच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने १०८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र या विजयानंतर आतापर्यंत एकत्र असलेले मित्र दुरावले असून, अनेक दशकांपासूनचे कट्टर राजकीय शत्रू एकमेकांच्या जवळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, काहीजण दुरावले गेले आहेत
डीएमके आणि काँग्रेसमध्ये उभी फूट
निवडणुकीनंतर सर्वात मोठा धक्का इंडिया आघाडीला बसला आहे. राज्यात डीएमके आणि काँग्रेसची युती संपुष्टात आली आहे. काँग्रेसने विजयच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा जाहीर केल्याने डीएमकेने संताप व्यक्त केला आहे. डीएमके खासदार कनिमोझी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून संसदेत पक्षाच्या खासदारांची बसण्याची व्यवस्था बदलण्याची मागणी केली आहे. "काँग्रेससोबतची आमची युती आता संपली आहे, त्यामुळे आम्हाला स्वतंत्र जागा देण्यात यावी," असे त्यांनी पत्रात म्हटलं आहे. काँग्रेसच्या या निर्णयाला डीएमकेने पाठीत खंजीर खुपसला असे म्हटलं आहे.
विजयला सत्तेपासून रोखण्यासाठी डीएमके-एआएडीएमके एकत्र?
राज्यात सध्या कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. विजयचा पक्ष १०८ जागांसह आघाडीवर असला तरी बहुमतासाठी त्यांना १० जागांची गरज आहे. अशा परिस्थितीत, विजयला सत्तेपासून रोखण्यासाठी डीएमके आणि एआएडीएमके हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकत्र येतील, अशी चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टालिन हे एआयएडीएमकेला बाहेरून पाठिंबा देऊन विजयची सत्ता स्थापनेची संधी हिरावून घेऊ शकतात, अशी चर्चा आहे. मात्र, कनिमोझी यांनी या चर्चांना अफवा म्हटले असून सध्या गोंधळाची स्थिती असल्याचे मान्य केले आहे.
कनिमोझींचा स्ट्राईक रेट सर्वात सरस
तमिळनाडूत सर्वत्र विजयची लाट असताना केवळ दक्षिण तमिळनाडूमध्ये डीएमकेने आपली पकड मजबूत ठेवली आहे. याचे श्रेय कनिमोझी यांना दिले जात आहे. त्यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या २२ जागांपैकी १३ जागांवर डीएमकेने विजय मिळवला. त्यांनी पक्षाच्या इतर सर्व ज्येष्ठ नेत्यांना मागे टाकले आहे. महत्त्वाचे म्हणजे कन्याकुमारी आणि तेनकाशी या भागात विजयच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.
आता सीपीआय, सीपीआयएम आणि व्हीसीके यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. व्हीसीके नेते थिरुमावलवन यांनी सांगितले की, विजयने पाठिंब्यासाठी पत्र दिले आहे, त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.
राष्ट्रपती राजवटीची टांगती तलवार?
तमिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ १० मे रोजी संपत आहे. जर त्यापूर्वी कोणत्याही पक्षाने बहुमत सिद्ध केले नाही किंवा सत्ता स्थापनेचा दावा केला नाही, तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आगामी ७२ तास तमिळनाडूच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.
Web Summary : DMK-Congress alliance ends in Tamil Nadu. Kanimozhi requests separate seating for DMK MPs. Political realignment occurs as DMK and AIADMK may unite to block Thalapathy Vijay's party from forming government. Presidential rule looms if no majority is reached.
Web Summary : तमिलनाडु में डीएमके-कांग्रेस गठबंधन खत्म। कनिमोझी ने डीएमके सांसदों के लिए अलग बैठने की व्यवस्था का अनुरोध किया। डीएमके और एआईएडीएमके थलपति विजय की पार्टी को सरकार बनाने से रोकने के लिए एकजुट हो सकते हैं। बहुमत न होने पर राष्ट्रपति शासन की आशंका।