EU सोबत करारानंतर आणखी एका देशाने भारतासमोर मैत्रीचा हात पुढे केला; अमेरिकेचा जळफळाट होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 14:13 IST2026-01-27T14:12:07+5:302026-01-27T14:13:02+5:30
ट्रम्प भारताला टॅरिफची धमकी देत आहेत. भारत अमेरिकेच्या दबावापुढे झुकेल असा ट्रम्प यांचा विचार आहे परंतु असं होताना दिसत नाही.

EU सोबत करारानंतर आणखी एका देशाने भारतासमोर मैत्रीचा हात पुढे केला; अमेरिकेचा जळफळाट होणार
नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांमध्ये भारताने युरोपियन युनियनसोबत आपली मैत्री आणखी मजबूत केली आहे. भारताने EU सोबत मुक्त व्यापार करार केला आहे. ज्याला मदर ऑफ ऑल डिल्स असं म्हटलं जाते. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या करारावर शिक्कामोर्तब झाले. दुसरीकडे कॅनडाही भारतासोबत संबंध मजबूत करण्याचा विचार करत आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी येत्या मार्चमध्ये भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. तर त्यांचे मंत्री टीम हॉजसन याच आठवड्यात भारत दौऱ्यावर येत आहेत.
टॅरिफवरून डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक भूमिका पाहता जागतिक स्तरावर त्याचे पडसाद उमटत आहेत. ट्रम्प यांनी कार्नी आणि भारताला आतापर्यंत अनेकदा धमकी दिली आहे परंतु दोन्ही देश ट्रम्प यांच्या धमकीला झुगारून संबंध मजबूत करत आहेत. दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमनंतर कार्नी यांनी ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिले. कॅनडा अमेरिकेमुळे पुढे जात नाही तर आम्ही कॅनेडियन यांच्यामुळे पुढे जातोय असं कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले. कॅनडा अमेरिकेमुळे आहे, कार्नी यांनी पुढच्या वेळी काही बोलण्याआधी हे लक्षात ठेवावे असं ट्रम्प यांनी म्हटलं होते.
ट्रम्प भारताला टॅरिफची धमकी देत आहेत. भारत अमेरिकेच्या दबावापुढे झुकेल असा ट्रम्प यांचा विचार आहे परंतु असं होताना दिसत नाही. भारताच्या वाढत्या ताकदीबाबत जगाला माहिती आहे. परंतु ट्रम्प त्यांच्या आक्रस्ताळ वागण्यामुळे कुणाचे काही ऐकत नाही. त्यात भारताने युरोपियन युनियनसोबत करार केला आहे. हा जागतिक जीडीपीच्या २५ टक्के आणि जागतिक व्यापाराच्या एक तृतीयांश भाग आहे. भारत आणि युरोपियन युनियनच्या कराराला मदर ऑफ ऑल डिल्स म्हटलं जाते. या करारामुळे भारतीयांसोबत युरोपियन लोकांसाठी मोठ्या संधी निर्माण होणार आहे.
कॅनडाही भारतासोबत संबंध मजबूत करणार
एकीकडे युरोपियन युनियनसोबत भारत करार करतंय तर दुसरीकडे कॅनडाही भारतासोबत संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. कॅनडाचे पंतप्रधान भारत दौरा करण्याच्या विचारात आहेत. कार्नी मार्चच्या पहिल्या आठवड्यात भारतात येऊ शकतात. त्यावेळी युरेनियम एनर्जी, मिनरल्स, आर्टिफिशियल इंटेलिजेंस डीलवर स्वाक्षरी होऊ शकते. मागील वर्षी कॅनडाचे पंतप्रधान कार्नीच्या आमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ७ समिटमध्ये सहभागी झाले होते. कार्नी यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री भारतात आले आहेत. कॅनडातील भारताचे उचायुक्त दिनेश पटनायक यांनी कार्नी यांच्या भारत दौऱ्याबाबत माहिती दिली. गेल्या २ वर्ष कॅनडासोबत चर्चा थांबल्यानंतर आता पुन्हा दोन्ही देश संबंध सुधारण्यासाठी पुढे येत आहेत.