१९ वर्षांनी चारही पीठांचे शंकराचार्य एकाच व्यासपीठावर येणार; दिल्लीत मोठं आंदोलन होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 21:09 IST2026-01-22T15:52:03+5:302026-01-22T21:09:56+5:30
१९ मे २००७ रोजी, बंगळुरू येथे रामसेतू संदर्भात एक परिषद आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये चारही पीठांच्या शंकराचार्यांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावली होती.

१९ वर्षांनी चारही पीठांचे शंकराचार्य एकाच व्यासपीठावर येणार; दिल्लीत मोठं आंदोलन होणार?
नवी दिल्ली - ज्योतिषपीठ शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या वादात मोठी बातमी समोर आली आहे. १९ वर्षांनी चार पीठांचे शंकराचार्य एकाच व्यासपीठावर येणार आहेत. १० मार्च २०२६ रोजी दिल्लीत गोमाता रक्षणासाठी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात गोमाता राष्ट्रमाता अभियानाच्या मंचातून चारही शंकराचार्य एकत्र येण्याची शक्यता आहे.
अविमुक्तेश्वरानंद यांना याआधीच २ पीठांनी समर्थन दिले आहे. तिसऱ्या पीठाचे समर्थन मिळाल्यानंतर खरा-खोटा वाद मागे पडणार आहे. पुरी पीठाचे शंकराचार्य निश्चलानंद, अविमुक्तेश्वरानंद नावावर उघड सहमती आतापर्यंत देत नव्हते परंतु २ दिवसांपूर्वी माघ मेळ्यात अविमुक्तेश्वरानंद यांना त्यांनी लाडके म्हटलं होते. गोरक्षणासाठी पुरी पीठाचे शंकराचार्य आधीपासून आंदोलन करत आहेत. पुरी पीठाचे शंकराचार्य निश्चलानंद यांनी गायींच्या रक्षणाचे व्रत घेण्यासाठी आपले सिंहासन आणि छत्र त्यागले आहे. गोरक्षणाच्या विषयावर चारही शंकराचार्यांचे एकत्र येणे म्हणजे अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर सर्व शंकराचार्यांची मान्यता असून सर्व शंकराचार्यांना आमंत्रणे देण्याची तयारी सुरू आहे.
यापूर्वी १९ मे २००७ रोजी, बंगळुरू येथे रामसेतू संदर्भात एक परिषद आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये चारही पीठांच्या शंकराचार्यांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावली होती. शृंगेरी येथे पहिले चतुष्पीठ परिषद १७७९ आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये चारही शंकराचार्य सहभागी झाले होते. आता धार्मिक इतिहासात तिसऱ्यांदा असं घडणार आहे जेव्हा चारही पीठांचे शंकराचार्य एकाच व्यासपीठावर एकत्र दिसतील. जर दिल्लीतील हा कार्यक्रम यशस्वी झाला तर धार्मिक इतिहासात ही तिसरी वेळ असेल जिथं चारही पीठांचे शंकराचार्य एकाच व्यासपीठावर एकत्र दिसतील. हा सनातन परंपरेसाठी एक ऐतिहासिक क्षण असेल. भूतकाळात गोरक्षणाशी संबंधित अनेक आंदोलने झाली आहेत आणि स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी या मुद्द्यावर अनेक वेळा उघडपणे बोलले आहे.