नवी दिल्ली -दिल्लीतील अनाज मंडी परिसरात आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत 43 जणांचा मृत्यू झाला. तर 50 हून अधिक जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाची 27 वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली होती. दरम्यान, या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
दिल्लीतील राणी झांशी रोडवरील अनाज मंडी परिसरात आज पहाटे हे भीषण अग्नितांडव घडले. या परिसरात असलेल्या एका तीन मजली बेकरीतील वरच्या मजल्यावर पहाटे पाच वाजता आग लागली. त्यानंतर ही आग संपूर्ण इमारतीत पसरली. हा भाग दाटीवाटीचा असल्याने मदत आणि बचाव कार्यात अडथळे येत होते. तसेच ही आग आणि धुराचे लोळ आजुबाजूच्या इमारतीत पसरल्याने अनेकजण धुरामध्ये गुदरमले.
दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे बंबही मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले. मात्र बघता बघता आग वाढत गेली. दरम्यान, अग्निशमन दलाने सुमारे 50 हून अधिक जणांना वाचवले. तर आगीत जखमी झालेल्यांना आरएमएल, एलएनजेपी, हिंदू राव आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या आगीत गुदमरून सुमारे 43 जणांचा मृत्यू झाला.