पंचवटी : गेल्या पंधरवड्यापासून पाऊस कोसळत असल्याने पालेभाज्यांची आवक वाढली असून, दरात घसरण झाली आहे. सर्वच प्रकारच्या पालेभाज्यांची आवक वाढत चालल्याने व त्या तुलनेत मागणी नसल्याने दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी बाजार समितीत शेतकऱ्यांनी कोथिंबीर माल विक्रीसाठी आणला; मात्र कोथिंबीर ओली असल्याने कोणीही खरेदी केली नाही. परिणामी शेतकऱ्यांना बाजार समितीत उघड्यावर जनावरांसाठी कोथिंबीर फेकून द्यावी लागली. बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या पालेभाज्यांची साठ ते सत्तर टक्के आवक वाढली आहे. शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्यामुळे व त्यातच पीक लागवडीचा खर्च व दळणवळण भाडेही सुटत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे शेतमालाची आवक वाढली, तर दुसरीकडे पाऊस सुरू असल्याने शेतमाल ओला होऊन नाशवंत होत आहेच शिवाय परराज्यातील बाजारपेठेत स्थानिक शेतमाल वाढल्याने बाजारभावात मोठी घसरण होत असल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले. बाजार समितीत सध्या कोथिंबीर ३ रुपये, शेपू ३, मेथी ३, पालक २, तर कांदापात ८ रुपये प्रति जुडी दराने मिळत आहे. (वार्ताहर)
पालेभाज्यांची आवक वाढली दरात घसरण
By admin | Updated: September 4, 2014 00:44 IST