मदतीचे स्पिरीट दिसले, आता रोगराई नियंत्रणाचे आव्हान!

By किरण अग्रवाल | Published: August 11, 2019 01:02 AM2019-08-11T01:02:18+5:302019-08-11T01:07:01+5:30

यंदाच्या पूरपाण्याने यंत्रणांना खबरदारीचा धडा घालून दिला आहे. नाशिककरांनी माणुसकी धर्माचे पालन करीत आपद्ग्रस्तांना मदतीचा हात दिला; परंतु अशी वेळच येऊ नये म्हणून कठोर उपाययोजनांची गरज आहे. यंदा कोल्हापूर, सांगलीत जे पहावयास मिळाले ते आपल्याकडे होऊ द्यायचे नसेल तर आपत्ती संबंधीच्या उपायांकडे डोळेझाक करता येऊ नये.

Spirit of help appears, challenge of disease control now! | मदतीचे स्पिरीट दिसले, आता रोगराई नियंत्रणाचे आव्हान!

मदतीचे स्पिरीट दिसले, आता रोगराई नियंत्रणाचे आव्हान!

googlenewsNext
ठळक मुद्देपूरपाण्याने डोळे उघडलेपूररेषा व धोकादायक वाड्यांचे प्रश्न त्वरित निकाली निघणे गरजेचे

सारांश

गोदामाईच्या पूरपाण्याने यंदा चांगलीच दाणादाण उडवली व जीव टांगणीला लावला असला तरी संकटकाळी मदतीला धावून जाण्याचे नाशिककरांचेही स्पिरीट प्रकर्षाने दिसून आले. अर्थात, ‘ती’ घडी गेली असली तरी, उद्ध्वस्त मनांना धीर देण्याची गरज असून, आपत्तीच्या वेळी केल्या जाणाऱ्या बातांना अंमलबजावणीत आणून कायमस्वरूपी बांध-बंदिस्तीचे प्रयत्न होणे अपेक्षित आहेत.

नाशिककरांसाठी पूरपरिस्थिती नवीन नाही. गोदावरी थेट शहराच्या मध्यवस्तीतूनच वाहत असल्याने जराही पूर आला, की गोदाकाठी उडणारी धावपळ व ओढवणारे नुकसान अपरिहार्य ठरलेले असते. यंदा तर कधी नव्हे अशी परिस्थिती बघावयास मिळाली. २००८ मधील पुरापेक्षाही भयंकर चित्र होते. नाशिककरांचा पूरमापक दुतोंड्या मारुती तर बुडालाच; पण नारोशंकराच्या घंटेलाही पाण्याने वेढले. अशात हाहाकार उडणे स्वाभाविक होते. पण, अडचणीच्या काळात धावून जाण्यासाठी ज्या मुंबई स्पिरीटची चर्चा होते, तेच नाशकातही अनुभवयास मिळाले. खुद्द पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आदी अधिकारी तातडीने कार्यालयाबाहेर पडून समस्या जाणून घेताना दिसले. आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे याही पदर खोचून चिखल तुडवत मदतीला धावलेल्या दिसल्या. नाही म्हणायला एकीकडे गोदावरीला आलेला पूर पाहण्यासाठी पुलावर ‘सेल्फी’ काढणाºया ‘सेल्फीशां’ची गर्दी झालेली असताना, अनेक सामाजिक संस्था, व्यक्तींनी सरकारी आवाहनाची वाट न पाहता पूरग्रस्तांच्या जेवणाची, रहिवासाची काळजी वाहिली. बाजारपेठांमध्ये अडकलेल्यांचे साहित्य काढून देण्यासाठी अनेकजण सरसावलेले दिसले. आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी हा जो संवेदनांचा पूर वाहिलेला दिसून आला तो खरा माणुसकी धर्म जागवणारा ठरला. कोण कुठले, ओळखीचे ना पाळखीचे; पण सुस्थितीत बहुतेक जण एका ‘स्पिरीट’ने बिकटावस्थेतील बांधवांसाठी सरसावलेले दिसले. आपत्तीतली ही सुहृदयता सुखावहच म्हणायला हवी.

अर्थात, वेळ निभावून गेली म्हणून निर्धास्त राहता येऊ नये. पुरामुळे नदीकाठी साचलेला गाळ तातडीने दूर करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे औषध फवारणी करून रोगराईला रोखण्याचे आव्हान आता महापालिका यंत्रणेपुढे आहे. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळलेले किंवा वाहून आलेले आहेत, दोन ते चार दिवस झालेत तरी ते हटविले गेलेले नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून रस्त्यावरील विजेचे दिवे बंद करण्यात आलेले होते, ते पूर्ववत सुरू झालेले नाहीत. तेव्हा या कामांमुळे अनारोग्याला व नवीन संकटाला निमंत्रण मिळण्याची शक्यता असल्याने त्याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे. येथे डास प्रतिबंधक धुरळणीच्या ठेक्यातच घोळ घातला जाताना दिसतो आहे. आहे त्यालाच मुदतवाढ देण्यासाठी अनेकांचा आटापिटा चाललेला दिसतो. अशात आपत्तीला इष्टापत्ती सिद्ध करू पाहणाऱ्यांचे फावणार असले तरी औषध फवारणी त्वरित होणे आवश्यक आहे.

महत्त्वाचे म्हणजे, २००८ मधील महापुरानंतर पूररेषा निश्चित करण्यात आली होती. यंदाच्या महापुराने तर त्या रेषेचाही पुनर्विचार करण्याची गरज दर्शवून दिली आहे. पण मुळात, आहे त्या पूररेषेचेच पालन होताना दिसत नाही. महापालिकेच्या निकषांना झुगारून वा त्या रेषेला बासनात गुंडाळून बांधकामे होताना दिसत आहेत. शहरातील वाडेही कोसळत आहेत. सुदैवाने जीवितहानी नाही, म्हणून रस्त्याने चालणारा किंवा लगतचा कुणी त्यामुळे धोक्यात येणार नाही असे नाही; तेव्हा केवळ नोटिसांचे सोपस्कार करण्याऐवजी कठोर पावले उचलून त्याबाबत निर्णय घ्यायला हवा. क्लस्टरची योजना त्याकरिता विचाराधीन आहे; पण वाड्याखाली दबले जाऊन काही अघटित घडण्यापूर्वी त्याचा निर्णय अपेक्षित आहे. बहुसंख्य रस्ते खड्डेमय झाले आहेत. दुचाकी चालकांच्या कमरेतले व मानेचे मणके तुटण्यापूर्वी हे खड्डे बुजविले जायला हवे. यंदा सर्वत्रच पावसाचे पाणी तुंबले. उपनगर परिसरात जिथे ड्रेनेज लाइनच नाही, तिथे पावसाळी गटारींचा विचारच करता येऊ नये. परंतु यंदाची अतिवृष्टी पाहता ती बाबही दुर्लक्षिता येऊ नये. नवीन परिसरात पावसाळी गटारींचे काम हाती घ्यायला हवे. सखल भागातील रस्ते-पुलांची उंची वाढविण्याचाही विचार व्हायला हवा. असा पाऊस दरवर्षी नसतो, अपवादानेच येतो असे म्हणून उपाययोजनांकडे दुर्लक्ष होता कामा नये. आपत्ती व्यवस्थापनाचा विचार करताना जास्तीच्या उपाययोजना हव्यात. यंदाच्या पूरपाण्याने त्यासाठी डोळे उघडून दिले आहेत म्हणायचे.

Web Title: Spirit of help appears, challenge of disease control now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.