नवरदेवाला ३ तास विलंब, मांडवात झाली तीन हजारांची दंडवसुली; त्र्यंबक विवाहाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 08:21 IST2026-04-27T08:20:40+5:302026-04-27T08:21:04+5:30
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चंद्राची मेट येथे २३ एप्रिल रोजी दुपारी १:३५ वाजेच्या मुहूर्तावर विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

नवरदेवाला ३ तास विलंब, मांडवात झाली तीन हजारांची दंडवसुली; त्र्यंबक विवाहाची चर्चा
नाशिक - उकाड्याने जीव नकोसा होत असताना मुहूर्तावर वधू-वरांवर अक्षता पडत नसल्याने होत असलेल्या विलंबालाही वऱ्हाडी मंडळी त्रासली आहे. याच विलंबाचा फटका त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगात परिसरात झालेल्या एका विवाह सोहळ्यात वर पक्षाला बसला आहे. नियोजित मुहूर्तापेक्षा तीन तास विलंबाने मांडवात पोहोचलेल्या वरपक्षाला बौद्धाचार्यांनी तीन हजारांचा दंड ठोठावत विलंब शुल्क वसूल केले आहे.
वेळेचे बंधन न पाळल्यामुळे बौद्ध महासभेच्या बौद्धाचार्यांकडून कारवाई
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चंद्राची मेट येथे २३ एप्रिल रोजी दुपारी १:३५ वाजेच्या मुहूर्तावर विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, ३ तास उलटूनही नवरदेव मांडवात पोहोचला नाही. उकाड्याने त्रस्त वऱ्हाडी अधिकच कावले. विवाह सोहळ्यात बौद्धाचार्यही ताटकळले. वेळेचे बंधन न पाळल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथून आलेले भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य राजेंद्र जयप्रकाश डोळस यांनी अनोखी कारवाई केली. त्यांनी वरपक्षाकडून तीन हजार रुपयांचा विवाह विलंब शुल्क आकारला. हा दंड अधिकृत पावतीसह वसूल केला.
वेळेचे महत्त्व टिकून राहावे म्हणून आर्थिक दंड वसूल केला. यामुळे उन्हातान्हात लागणारे लग्न समारंभ वेळेत लागतील. वेळेच्या बंधनाबाबत एक पाऊल पुढे टाकले असून, ते सर्वांनी पाळावे. - राजेंद्र डोळस, बौद्धचार्य, भारतीय बौद्ध महासभा