कोरोनाबाबत ग्रामीण भागात जाणीव जागृती आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:12 IST2021-07-17T04:12:55+5:302021-07-17T04:12:55+5:30
येवला : वैयक्तिक आरोग्य, मानसिक आरोग्य, कौटुंबिक आरोग्य व सामाजिक आरोग्य जपण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. सध्या ...

कोरोनाबाबत ग्रामीण भागात जाणीव जागृती आवश्यक
येवला : वैयक्तिक आरोग्य, मानसिक आरोग्य, कौटुंबिक आरोग्य व सामाजिक आरोग्य जपण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत असून, ग्रामीण भागात लोकांमध्ये जाणीव जागृती होणे आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डॉ. दीपक ठोंबरे यांनी केलेे.
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘कोविड-१९ व सामाजिक आरोग्य जाणीव जागृती’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानाप्रसंगी डॉ. दीपक ठोंबरे बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते.
कोरोनाला गांभीर्याने घेण्याची गरज असून, नियमित मास्क, सॅनिटायझरचा वापर व सामाजिक अंतर पाळले तर कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आपल्याला थोपवता येईल. नियमित व्यायाम, सकस आहार यामुळे रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. यामुळे कोरोनाला प्रतिबंध होऊ शकतो. कोरोनाचे लवकर निदान झाल्यास कोरोना निश्चित बरा होतो. कोरोनात मृत्युदर फक्त दोन किंवा तीन टक्के असल्याने भीती बाळगण्याचे कारण नाही. केवळ भीती बाळगल्याने अनेक रुग्ण दगावले असल्याचेही डॉ. दीपक ठोंबरे यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गमे यांनी, कोरोना प्रतिबंधासाठी महाविद्यालयातर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.
कार्यक्रमास उपप्राचार्य शिवाजी गायकवाड, डॉ. अरुण वनारसे, वैभव सोनवणे, देवीदास बागुल उपस्थित होते. कार्यक्रमास डॉ. गौतम कोलते यांचे तांत्रिक साहाय्य लाभले. कार्यक्रमानंतर महाविद्यालय परिसरात महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष प्राचार्य डॉ. निकम यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. प्रास्ताविक संयोजक डॉ. मनीषा गायकवाड यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. वसंत गायकवाड यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. धनराज धनगर यांनी, तर आभार प्रदर्शन प्रा. कैलास बच्छाव यांनी केले.