लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण काम करण्याचा प्रताप नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. अवघ्या दोन तासात रस्ता उखडल्याचे नंदुरबारातील अव्वलगाझी दर्गासमोरील रस्त्याबाबत घडला. चौकशीची मागणी करण्यात येत आहे.नंदुरबारातील धुळे रोडवरील अव्वलगाझी दर्गा ते भोणे फाट्यापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. परंतु काँक्रीटीकरणाला जोड रस्ता न केला गेल्याने दोन्ही बाजुला उंचवटा तयार झाला आहे. त्यामुळे वाहनांना कसरत करावी लागते. शिवाय खड्डा तयार झाल्याने पावसाचे पाणी देखील मोठ्या प्रमाणावर साचत होते. जोड रस्त्याचे काम करावे अशी मागणी करण्यात येत होती. जयहिंद फौंडेशनने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर काम करण्यात आले. परंतु खडीकरण व त्यावरील डांबरीकरणाचे काम भर पावसात करण्यात आले. पावसाचा अंदाज असतांनाही काम सुरू करण्यात आले. भर पावसात डांबरीकरण देखील झाले. त्यामुळे अवघ्या दोन तासात डांबरीकरण व खडी उखडली गेली. पुन्हा खड्डा पडून पावसाचे पाणी साचले. रस्ता तयार करतांना पाण्याचा निचरा होईल अशी कुठलीही सोय करण्यात आली नाही. पाणी रस्त्यावरच येवून थांबत आहे. भर पावसात रस्ता व डांबरीकरण काम करण्याचे गौडबंगाल काय? झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भर पावसात झाले रस्त्याचे डांबरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 12:36 PM