इ चायनावालो व्हायरस हाय, इहाल आमू आदिवासी भागाम आवा न्हा देणार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 12:48 PM2020-03-22T12:48:09+5:302020-03-22T12:48:16+5:30
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘इ चायनावालो व्हायरस हाय, इहाल आमू आदिवासी भागाम आवा न्हा देणार...’ ...
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ‘इ चायनावालो व्हायरस हाय, इहाल आमू आदिवासी भागाम आवा न्हा देणार...’ हा सूर आहे सातपुड्यातील सर्वात उंच टेकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलीआंबा, ता.अक्कलकुवा या गावातील महिलांचा. सध्या कोरोनाची भीती जगभर सुरू असताना सातपुड्यातील अतिदुर्गम भागातही या आजारापासून संरक्षणासाठी जनजागृतीचे पडसाद उमटत आहेत.
कोरोनाच्या बचावासाठी सरकारतर्फे व प्रशासनातर्फे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती व खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर रविवार, २२ मार्च रोजी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले असून त्याचीही जागृती सर्वत्र केली जात आहे. सातपुड्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या गावांमध्ये देखील या जागृतीचे पडसाद उमटत आहेत. घराबाहेर न पडण्याच्या सरकारच्या आवाहनामुळे या भागातील अनेकांचा रोजगार बुडाला आहे. सातपुड्यातील अनेक कुटुंबांच्या घरात दिवसा काम न केल्यास रात्री चूल पेटत नाही, अशी स्थिती असतानाही कोरोनाच्या मुकाबल्यासाठी या भागातील आदिवासी देखील धीटपणे उभे राहिले आहेत. यासंदर्भात अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या गुलीआंबा व त्या परिसरातील चित्र पाहिल्यास या भागातही मोठ्या प्रमाणावर जागृती आल्याची स्थिती आहे.
गुलीआंबा हे सातपुड्यातील सर्वात उंच शिखर असून त्याच्याच पायथ्यात डोंगरदºयात चार पाड्यात विस्तारलेले गाव. येथे एकूण १२१ कुटुंब राहतात. सर्वच कुटुंब याबाबत दक्ष असल्याचे दिसून आले. तेथील मथुराबाई उदेसिंग पाडवी यांनी सांगितले, हा चायनातून आलेला रोग आहे. तो रोग आम्ही घेणार नाही आणि या भागात येऊही देणार नाही. त्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी आम्ही घेत आहोत. मयतूबाई मिथुन वसावे यांनी सांगितले, सरकारने व आमच्या कार्यकर्त्यांनी हा आजार टाळण्यासाठी जास्त लोकांमध्ये न जाण्याचे व घरीच थांबण्याचे सांगितले आहे. त्यामुळे आजार या भागात येऊ नये म्हणून आम्ही सर्व सूचनांचे पालन करू. भले त्यासाठी रोजगार बुडाला तरी चालेल. अशाच प्रतिक्रिया देवकीबाई जोकू पाडवी, मोगराबाई पाडवी यांनी व्यक्त केल्या. एकूणच गुलीआंबा व तेथील केलवाडी, शेल्टामाळ, जयामाळ या पाड्यांमध्येही तसेच लगतच्या सावर, पिंपळगाव, आमली या भागात कोरोनाबाबत लोक जागरुक असल्याचे दिसून येत आहे. कार्यकर्त्यांमार्फत त्यासाठी आदिवासी भाषेतील ध्वनीफिती व मोबाईलवरील चित्रफितीद्वारे जनजागृती केली जात असल्याचे चित्र आहे.