जि.प.मध्ये अखेर काँग्रेस-शिवसेनेचेच जमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:39 PM2020-01-18T12:39:07+5:302020-01-18T12:39:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : काँग्रेस व शिवसेनेने अखेर राज्य, नंदुरबार पालिका यामध्ये असलेल्या आघाडीचा कित्ता गिरवत जिल्हा परिषदेवरही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : काँग्रेस व शिवसेनेने अखेर राज्य, नंदुरबार पालिका यामध्ये असलेल्या आघाडीचा कित्ता गिरवत जिल्हा परिषदेवरही सत्ता स्थापन केली. दोन्ही पदांवर अनुक्रमे काँग्रेस व शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. निवडीनंतर काँग्रेस व शिवसेनेच्या नेते व पदाधिका:यांनी एकच जल्लोष केला.
जिल्हा परिषदेवर कुणा एका पक्षाला बहुमत मिळालेले नव्हते. भाजप व काँग्रेसला सारख्याच अर्थात प्रत्येकी 23 जागा मिळाल्या होत्या. भाजपच्या साथीला राष्ट्रवादी गेली, परंतु तरीही बहुमतासाठी त्यांना तीन सदस्यांची गरज लागत होती. त्यामुळे शिवसेनेच्या सात सदस्यांना महत्त्व प्राप्त झाले होते. शिवसेनेची भुमिका शेवटर्पयत स्पष्ट होत नव्हती. त्यामुळे नेमकी सत्ता कुणाची बसणार याबाबत उत्सूकता लागली होती. काँग्रेस व शिवसेनेने आपलीच सत्ता येणार म्हणून दावा सोडलेला नव्हता.
शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये दोन दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू झाले होते. अखेर गुरुवारी रात्री समझोता होऊन अध्यक्षपदी काँग्रेस तर उपाध्यक्षपदावर शिवसेनेचा उमेदवार राहील हे स्पष्ट झाले. त्यामुळे काँग्रेस-सेनेकडे 30 सदस्य झाले तर भाजपकडे 26 सदस्य कायम होते. तरीही भाजपने आमचीच सत्ता स्थापन होईल हा दावा कायम ठेवला होता.
अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी दाखल झाले आठ नामांकन
सकाळी 11 वाजता अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे अजीत सुरुपसिंग नाईक, अॅड.सिमा पद्माकर वळवी यांनी तर भाजपतर्फे कुमुदिनी विजयकुमार गावीत, अर्चना शरदकुमार गावीत यांनी अर्ज दाखल केले.
उपाध्यक्षपदासाठी अॅड.राम रघुवंशी, जयश्री दिपक पाटील, अर्चना गावीत व विजया गावीत यांनी अर्ज दाखल केले. छाननीत सर्व अर्ज वैध ठरल्यानंतर दुपारी दोन ते तीन वाजेदरम्यान माघारीच्या मुदतीत अध्यक्षपदासाठी अजीत नाईक व अर्चना गावीत यांनी तर उपाध्यक्षपदासाठी अर्चना गावीत व विजया गावीत यांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे अध्यक्षपदासाठी कुमुदिनी विजयकुमार गावीत व सिमा वळवी यांच्यात सरळ व उपाध्यक्षपदासाठी राम रघुवंशी व जयश्री पाटील यांच्यात सरळ लढत स्पष्ट झाली.
प्रत्यक्ष सभेच्या वेळी भाजपच्या गटनेत्या कुमुदिनी गावीत व सदस्य भरत गावीत यांनी अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता आमचा सिमा वळवी यांना पाठींबा असल्याचे सांगितले. परंतु प्रक्रियेनुसार निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. अध्यक्षपदासाठी उमेदवार सिमा वळवी यांच्यासह सर्वच 56 सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. त्यामुळे सिमा वळवी यांना सर्वच 56 मते मिळाली.
उपाध्यक्षपदासाठी मात्र भाजपने मतदान करीत आपले उमेदवार जयश्री पाटील यांना मतदान केल्याने त्यांना 26 मते मिळाली. राम रघुवंशी यांना काँग्रेस व शिवसेनेने मतदान केल्याने त्यांना 30 मते मिळाल्याने रघुवंशी यांना विजयी घोषीत करण्यात आले.
निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड तर सहायक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी काम पाहिले.
निवडीनंतर शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन थोरात, सेनेचे नेते दिपक गवते, जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, आमशा पाडवी, मनोज रघुवंशी आदी उपस्थित होते.
अध्यक्ष व उपाध्यक्षपदी विराजमान झालेले सिमा वळवी व राम रघुवंशी या युवकांच्या हाती सत्तेची धूरा सोपविण्यात आली आहे. दोन्हीही सदस्य हे पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद चालवितांना त्यांची काही प्रमाणात कसरत होणार आहे. परिणामी विषय समिती सभापती निवडतांना अनुभवी व्यक्तींना प्राधान्य द्यावे लागणार आहे. जिल्हा परिषदेत आधीच जवळपास 20 सदस्य तरुण निवडून आले आहेत. त्यात अध्यक्ष व उपाध्यक्षपदीही आता युवक निवडले गेले आहेत.