नांदेड : नवरी नटून थटून तयार, नवरदेवही बाशिंग लावून सज्ज आणि अक्षता टाकण्यासाठी वऱ्हाडींची लगबग... सगळं काही ठरल्याप्रमाणे सुरू असतानाच निसर्गाने मात्र वेगळाच खेळ मांडला. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने अशी काही एन्ट्री केली की बघता बघता लग्नाचा मांडवच उडून गेला! पण म्हणतात ना, ‘गावकऱ्यांनी ठरवलं तर काहीच अशक्य नाही’. अशाच जिद्दीच्या जोरावर माहूर तालुक्यातील लखमापूर येथे गुरुवारी एका आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याची ‘शुभमंगल’ गाठ बांधली गेली.
लखमापूर येथील श्रावणी जाधव आणि माहूरचा अर्जुन राठोड यांच्या लग्नाचा मुहूर्त दुपारचा होता. लग्नविधींना सुरुवात होणार इतक्यात अचानक आभाळ भरून आलं आणि वादळी वाऱ्यासह पावसाने बॅटिंग सुरू केली. वाऱ्याचा वेग इतका होता की, मांडव क्षणात उडून गेला. वऱ्हाडींची पळापळ झाली, पण नवरदेव-नवरीने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हार मानली नाही.
पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता आणि मुहूर्त तर टळत चालला होता. अखेर एका हाताने छत्री सावरत आणि दुसऱ्या हाताने विधी करत या जोडप्याचे लग्न लावण्यात आले. नवरी-नवरदेवाच्या डोक्यावर छत्र्या धरून ब्राह्मणांनी मंत्रोच्चार केले. भर पावसात ‘कुर्यात सदा मंगलम’चा आवाज घुमला आणि श्रावणी-अर्जुनने एकमेकांच्या गळ्यात माळ घातली.
वऱ्हाडींचा समजूतदारपणा अन् जिद्दीचा विजय
पावसामुळे जेवणावळीत आणि बसण्याच्या व्यवस्थेत मोठी गैरसोय झाली, तरीही वऱ्हाडी मंडळींनी काढता पाय न घेता भर पावसात उभे राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले. ‘वरूण राजानेच अक्षता टाकून आशीर्वाद दिलाय’ अशी चर्चा लग्नमंडपात रंगली होती.
Web Summary : Despite a storm destroying their wedding tent in Lakhmapur, a determined couple persevered. Braving rain with umbrellas, they completed the ceremony, showcasing resilience and the unwavering support of their guests. The wedding proceeded against all odds.
Web Summary : लखमापुर में तूफान से शादी का मंडप नष्ट हो गया, फिर भी एक दृढ़ जोड़े ने हार नहीं मानी। छातों के साथ बारिश का सामना करते हुए, उन्होंने समारोह पूरा किया, जो लचीलापन और उनके मेहमानों के अटूट समर्थन को दर्शाता है। शादी हर मुश्किल के खिलाफ आगे बढ़ी।