नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 15:49 IST2026-04-16T15:48:55+5:302026-04-16T15:49:43+5:30
खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून दोन सख्या भावांसह चार चिमुकल्यांचा अंत.

नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
नांदेड: शहरातील देगलूर नाका भागात गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. शाळा सुटल्यानंतर घराकडे परतत असताना, रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्या भावांचा समावेश असून या घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहर सुन्न झाले आहे.
शाळेची दप्तरं काठावरच राहिली...
इस्लामपूरा भागातील मोहम्मद अली (१३), सय्यद फूरखान (१३), मोहम्मद अदनान (१०) आणि मोहम्मद रेहान (११) अशी मृत मुलांची नावे आहेत. यातील फूरखान आणि रेहान हे दोघे सख्खे भाऊ होते. हारुनबाग परिसरात नाल्याचे काम सुरू असल्याने तिथे मोठे खड्डे पडले आहेत. शाळा सुटल्यानंतर या मुलांनी तिथे पोहण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचाही मृत्यू झाला. डबक्याच्या काठावर या मुलांचे गणवेष, दप्तरं आणि बूट सापडल्याने पाहणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले.
प्रशासकीय अनास्था समोर
या परिसरात महापालिकेकडून कंत्राटदारामार्फत नाल्याचे काम सुरू आहे. मात्र, हा जीवघेणा खड्डा नेमका कोणी खोदला आणि तो उघडा का ठेवला, याची कोणतीही माहिती महापालिकेकडे नाही. नागरिकांनी स्वतः पाण्यात उतरून या मुलांचे मृतदेह बाहेर काढले. या निष्काळजीपणासाठी जबाबदार कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.