"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 17:23 IST2026-04-16T17:20:10+5:302026-04-16T17:23:36+5:30
लोकसभेत महिला आरक्षणासंदर्भातील नारी शक्ती वंदन विधेयकावर चर्चा सुरू असताना उद्धवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाच्या काही नेत्यांचा उल्लेख केला. त्यानंतर भाजपा खासदार निशिकांत दुबेंनी थेट आदित्य ठाकरेंवर हत्येचा आरोप केला.

"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
केंद्र सरकारच्या नारी शक्ती वंदन विधेयकावर चर्चा सुरू असताना उद्धवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाकडून महिलांचा सन्मान केला जातो का, असे म्हणत बलात्कार प्रकरणातील कुलदीप सेंगर आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांचा उल्लेख केला. त्यानंतर खासदार निशिकांत दुबे उठले आणि त्यांनी आदित्य ठाकरे यांनी तर अभिनेत्रीची हत्या केलीये आहे, असे म्हटले. त्यानंतर लोकसभेत प्रचंड गोंधळ उडाला.
विधेयकावर बोलत असताना खासदार अरविंद सावंत म्हणाले, "दिल्लीत कार्यक्रम झाला. आमच्या एका हुशार आयएएस अधिकाऱ्याने त्यात एक लेख लिहिला. यांचे (भाजपा) सरकार महाराष्ट्रात आहे. त्या महिला अधिकाऱ्याने लिहिले की, सरकारमधील एका मंत्र्यांने सांगितले की, मला महिला अधिकारी नको. हे महिला अधिकाऱ्यांच्या सन्मानाची, अधिकाराची आणि सुरक्षेच्या चर्चा करतात?"
"कुलदीप सेंगर कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे? हे विसरू नका.ब्रिजभूषण शरण सिंह कोणत्या पक्षाचा आहे? हे महिलांच्या सन्मानाची गोष्ट करतात", असे अरविंद सावंत म्हणाले. त्यानंतर भाजपा खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावर सावंत म्हणाले की, बलात्कारी तुम्हाला खूप प्रिय आहेत का?"
निशिकांत दुबे म्हणाले, "आदित्य ठाकरेंनी अभिनेत्रीची हत्या केली"
लोकसभा तालिकाध्यक्षांनी खासदार निशिकांत दुबेंना बोलण्याची संधी दिली. निशिकांत दुबे म्हणाले, "जर हे कुलदीप सेंगर आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याबद्दल बोलणार असतील, तर आदित्य ठाकरेंबद्दलही बोललं जाईल. त्यानेही अभिनेत्रीला मारले आहे. इथेच चर्चा करुयात", असे दुबे म्हणताच उद्धवसेनेसह विरोधी बाकांवरील सर्व खासदार आक्रमक झाले आणि सभागृहात गोंधळ उडाला.
अरविंद सावंत आणि विरोधकांनी दुबेंवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर तालिकाध्यक्ष म्हणाले, ते जे बोलले आहेत. ते कामकाजातून वगळण्यात आले आहे. ते जे काही बोलतील ते कामकाजात घेतले जाणार नाही.
दुबेंनी माफी मागितली पाहिजे
त्यानंतर अरविंद सावंत आणि सुप्रिया सुळे म्हणाल्या की त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्यानंतर बराच वेळ गोंधळ सुरू राहिला. तालिकाध्यक्षांनी उभे राहून सदस्यांना शांतता पाळण्यास सांगून सावंतांना बोलू द्या असे म्हणाले.
त्यानंतर सावंत म्हणाले की, कुणाला बदनाम करायचे असेल, तर मी तडीपारचं नाव घेऊ का? कोण तडीपार होतं. एपस्टिन फाइल्सचं नाव घेऊ का? बोला ना, मला तोंड उघडायला लावू नका", असे सावंत म्हणाले.