"तुझाही पानसरे करू...", संजय गायकवाडांच्या कथित धमकीने खळबळ; वडेट्टीवारांचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र, कठोर कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 16:38 IST2026-04-24T16:36:43+5:302026-04-24T16:38:11+5:30
या प्रकरणावरून आता राजकारण तापले असून, वडेट्टीवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

"तुझाही पानसरे करू...", संजय गायकवाडांच्या कथित धमकीने खळबळ; वडेट्टीवारांचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र, कठोर कारवाईची मागणी
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका कथित ऑडिओ क्लिपमुळे वादळ निर्माण झाले आहे. 'शिवाजी कोण होता' या प्रसिद्ध पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणावरून आता राजकारण तापले असून, वडेट्टीवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, कॉ. गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाच्या प्रकाशनावरून हा वाद उद्भवला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रकाश आंबी यांना फोन करून अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, "तुझाही गोविंद पानसरे करतो" अशा शब्दांत ही धमकी देण्यात आल्याने राज्यातील वैचारिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वडेट्टीवारांचा आक्रमक पवित्राया प्रकरणाची गंभीर दखल घेत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. लोकप्रतिनिधीच्या पदावर बसलेली व्यक्ती जर गुंडगिरीची भाषा वापरत असेल, तर हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. ही धमकी केवळ एका व्यक्तीला नसून महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला दिलेले आव्हान आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली
एकीकडे विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले असताना, सत्ताधारी गटाने मात्र सावध भूमिका घेतली आहे. व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासणे गरजेचे असून, राजकीय हेतूने हा वाद वाढवला जात असल्याचा दावा काही सत्ताधारी नेत्यांनी केला आहे. मात्र, या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपातीपणे व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर
महाराष्ट्रात यापूर्वीही विचारवंतांच्या हत्या झाल्याचा काळा इतिहास आहे. अशा परिस्थितीत एका आमदाराने जाहीरपणे अशा प्रकारची धमकी देणे, हे राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. आता मुख्यमंत्री या पत्रावर काय कारवाई करतात आणि पोलीस संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.