निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...

By योगेश पांडे | Published: June 10, 2024 09:54 PM2024-06-10T21:54:13+5:302024-06-10T21:54:18+5:30

'आता देशाच्या समस्या सोडविण्याचा विचार करा, वर्षभरापासून धगधगणाऱ्या मणिपूरकडे लक्ष द्या.'

Violation of limits during election campaign, now think about solving the country's problems, said Mohan Bahgwat | निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...

निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...

नागपूर: निवडणूक ही लोकशाहीतील नियमित प्रक्रिया आहे. त्यात स्पर्धा असली तरी मर्याचा आवश्यक असते. निवडणूकीच्या प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन झाले. आता निवडणूक संपली असून सर्वच पक्षांनी देशातील समस्यांना सोडविण्यावर विचार केला पाहिजे, या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी नागपुरातून सर्वच राजकीय पक्ष व नेत्यांचे कान टोचले. संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयच्या समारोपप्रसंगी ते बोलत होता.
रेशीमबाग येथील मैदानावर आयोजित कार्यक्रमाला छत्रपती संभाजीनगरच्या श्री क्षेत्र गोदावरी धामचे पीठाधीश महंत रामगिरीजी महाराज, वर्गाचे सर्वाधिकारी इक्बालसिंग, प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, महानगर संघचालक राजेश लोया प्रामुख्याने उपस्थित होते.

निवडणूकीचे निकाल आले व सरकारदेखील स्थापन झाले. मात्र जे झाले ते का झाले याची चर्चा सुरू आहे. आपल्या देशात दर पाच वर्षांनी होणारी ही घटना आहे. दर निवडणूकीत मतदानवाढीचा आम्ही प्रयत्न करतो. मात्र निकाल असेच का आले याची चर्चा करत नाही. निवडणूक युद्ध नसून स्पर्धा आहे. त्यात मर्यादा असायला हवी. असत्याचा उपयोग करणे योग्य नाही. ज्यापद्धतीने प्रचारात टीका झाली. समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. विनाकारण संघासारख्या संघटनांनादेखील यात खेचण्यात आले. तंत्रज्ञानाची मदत घेऊन असत्य बाबी पसरविण्यात आल्या. संसदेत जाऊन देश चालविणे हे सर्व पक्षांचे ध्येय असले पाहिजे. सहमती बनवून देश चालवायला हवा.

तीच आपल्या देशाची परंपरा आहे. समाजातील दोन्ही बाजू समोर यावा यासाठी संसद असते. सत्ताधारी व विरोधक वेगवेगळ्या पैलूंवर विचार करतात. मुळात विरोधी नव्हे तर प्रतिपक्ष हा योग्य शब्द असून तेदेखील त्यांचा पैलू संसदेत मांडत असतात. त्याचादेखील विचार व्हायला हवा, असे सरसंघचालक म्हणाले. जो मर्यादेचे पालन करतो त्याच्यात अहंकार येत नाही व तोच खरा सेवक असतो, असे म्हणत सरसंघचालकांनी भाजप नेत्यांना अप्रत्यक्षपणे चिमटा काढला. सनातन संस्कृतीला नष्ट करण्याचे प्रयत्न बाहेरून आलेल्या तत्वांकडून झाले. मात्र संतपरंपरा व समर्पण भावाने कार्य करणाऱ्यांमुळे भारतीय संस्कृती अबाधित आहे. एका वर्गाला क्षुद्र म्हणत त्रास देण्यात आला. आता ही चूक सुधारण्याची वेळ आली आहे असे मत महंत रामगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.

आव्हाने संपलेली नाही, कामाला लागा
मागील दहा वर्षांत बरेच काही चांगले झाले. आर्थिक स्थिती चांगली झाली आहे. सामरीक स्थिती निश्चितपणे चांगली आहे. जगभरात देशाची प्रतिष्ठा वाढली आहे. कला, क्रीडा, संस्कृती, ज्ञान-विज्ञानमध्ये देश मार्गक्रमण करत आहे. केंद्रात रालोआचेच सरकार परत आले असले तरी देशासमोरील आव्हाने संपलेली नाहीत. निवडणूकीच्या उत्साहात जो अतिरेक झाला त्यापासून दूर जात समस्यांवर चर्चा व्हायला हवी, असे सरसंघचालकांनी प्रतिपादन केले.

मणिपूरवर विचार करा
विकासाचे मापदंड रचण्यासाठी देशात शांती हवी. अशांतीने देश चालत नाही. मणिपूर एका वर्षापासून पेटतो आहे. जुने गनकल्चर बंद झाले असे वाटत होते. मात्र द्वेषाचे वातावरण निर्माण केल्याने मणिपूरमध्ये त्राही त्राही झाली आहे. आता तरी त्या स्थितीचा विचार व्हायला हवा, असे सरसंघचालकांनी सुनावले.

सरसंघचालकांचे महत्त्वाचे बिंदू
- यावर्षी हिलस्टेशनवरदेखील गरमी जाणवली. अनेक महानगरांमध्ये पाण्याचे संकट जाणवले. पर्यावरणाचे संकट वाढत आहे. भारत संस्कारांतून पर्यावरणाचा मित्र असल्याचे मानतो.
- ज्ञान-विज्ञानाचा आधुनिक गोष्टी व कालसुसंगत प्राचीन ज्ञान यांना सोबत आणत कार्य झाले पाहिजे.
- सर्वांनी एकत्रित होऊन चालायला हवे. आपापल्या पूजांवर श्रद्धा ठेवून इतरांच्या पुजापद्धतीचे सन्मान करायला हवा.
- इस्लाम, ईसाईयत काय आहे त्याचा विचार करावा लागेल. कालप्रवाहात आलेल्या विकृती हटवाव्या लागतील.
- देशात कायद्याचे पालन व्हायला हवे. लाल सिग्नलवर वाहन थांबविलेच पाहिजे.
- काम करा, मात्र मी केला हा अहंकार बाळगू नका.

समाजाने अस्पृश्यता हटविण्यावर भर द्यावा
या संस्कृतीच्या रितीला विसरलो तेव्हापासून आपले पतन झाले. आपण आपल्याच भावंडांना अस्पृश्य म्हणत बाजुला ठेवले. त्याला वेद, उपनिषद यांचा आधार नाही. काही स्वार्थी लोकांनी रचलेले ते जाळे आहे. अस्पृष्यता भेदभाव कालबाह्य आहे. समाजात एकता हवी. समाजात अन्याय झाल्याने एकमेकांबद्दल द्वेष व अविश्वास आहे. अस्पृश्यता हटविण्यावर समाजाने भर द्यावा, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.

Web Title: Violation of limits during election campaign, now think about solving the country's problems, said Mohan Bahgwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.