सतरा वर्षात १.३३ अंशाने वाढले नागपूरचे सरासरी तापमान
By निशांत वानखेडे | Updated: April 22, 2026 19:27 IST2026-04-22T19:26:45+5:302026-04-22T19:27:08+5:30
प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर, मुंबई प्रेस क्लब आणि असर सोशल इम्पॅक्ट अॅडव्हायजर्स यांच्यावतीने ‘उष्णतेच्या लाटा, आरोग्य आणि हवामान’ या विषयावर चर्चासत्राचे आयाेजन बुधवारी नागपूर प्रेस क्लब येथे करण्यात आले.

सतरा वर्षात १.३३ अंशाने वाढले नागपूरचे सरासरी तापमान
- निशांत वानखेडे
तज्ज्ञांनी मांडले तापमानवाढ, हवामान बदलाचे वास्तव : हिवाळ्याचा काळ घटला, उन्हाळा वाढला, पाऊस लहरी झालानागपूर : आतापर्यंत जागतिक समजून दुर्लक्ष करीत असलेली हवामान बदल आणि ग्लाेबल वार्मिंगची समस्या आता आपल्या घरापर्यंत पाेहचली आहे. हाेय, गेल्या दाेन दशकात नागपूरसह विदर्भाच्या हवामानात गंभीर बदल झाले आहेत. मागील १७ वर्षात संत्रानगरीच्या सरासरी तापमानात १.३३ अंशाने वाढ झाली आहे आणि पुढच्या ३० वर्षात त्यात दाेन ते अडीच अंशाची वाढ हाेईल, जे अतिशय गंभीर संकेत असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर, मुंबई प्रेस क्लब आणि असर सोशल इम्पॅक्ट अॅडव्हायजर्स यांच्यावतीने ‘उष्णतेच्या लाटा, आरोग्य आणि हवामान’ या विषयावर चर्चासत्राचे आयाेजन बुधवारी नागपूर प्रेस क्लब येथे करण्यात आले. यावेळी प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरचे पूर्वानुमान अधिकारी डाॅ. प्रवीण कुमार यांनी हवामान बदल व तापमानवाढ यावर आणि राज्याच्या साथराेग विभागाचे निवृत्त सर्वेक्षण अधिकारी डाॅ. प्रदीप आवटे यांनी तापमान वाढीचे परिणाम यावर मार्गदर्शन केले.
विदर्भाच्या हवामानातील काही गंभीर बदल डाॅ. प्रवीण कुमार यांनी नाेंदविले. पूर्वी हिवाळा किमान तीन महिने चालायचा व फेब्रुवारीपर्यंत हिवाळ्याचे दिवस गणले जायचे. मात्र गेल्या काही वर्षात थंडीचा काळ घटत चालला असून फेब्रुवारीमध्येच उन्हाचा त्रास वाढत चालला आहे. पावसाळ्याचे दिवस घटले असून कमी कालावधीत अत्याधिक पाऊस हाेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काेणत्याही ऋतुमध्ये अवकाळी पावसाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून विजांच्या कडकडाटाने मृत्युचे प्रमाणही वाढले आहे. तापमानवाढीमुळे सामाजिक, आर्थिक प्रभावांसह मानवी आराेग्यावर गंभीर परिणाम दिसून येत असल्याचे डाॅ. आवटे यांनी सांगितले.
‘हीट वेव्हज’ची वारंवारता वाढली, नागपुरात उष्ण बेटे तयार झाली
डाॅ. प्रवीण कुमार यांनी सांगितले, नागपूर शहर ‘अर्बन हीट आयलॅंड’ म्हणून उदयास येत आहे. शहरात इतवारी, महाल, मानेवाडा, पश्चिम नागपूरचा परिसर उष्ण बेट’ म्हणून रुपांतरीत हाेत आहे. उष्ण लाटांची वारंवारता वाढली असून उष्णतेचे दिवसही वाढले आहेत. नागपूरसह अकाेला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर हे जिल्हे उष्ण लाटांच्या प्रभावात आली आहेत.
मुंबईसारखा दमटपणा
दिवसभर अत्याधिक तापमानानंतर सायंकाळी आकाशात ढग तयार हाेतात. हे ढग हीट रेडिएशन आकाशात न जाऊ देता खाली दाबतात, ज्यामुळे उष्ण रात्रीचे प्रमाणही वाढले असून वर्धा जिल्हा यामुळे सर्वाधिक प्रभावी आहे. दुसरीकडे उत्तरेकडील काेरडे वारे आणि बंगालची खाडी व अरबी समुद्रातील आर्द्रतायुक्त वाऱ्यांचे मिश्रण हाेत विदर्भात चक्रवात तयार हाेताे. ज्यामुळे दमटपणा वाढला असून विदर्भाच्या तापमानानुसार तीव्रता वाढली असल्याचे डाॅ प्रवीण कुमार यांनी सांगितले.
तापमान वाढीमुळे मृत्युदर वाढला
- २०२२ मध्ये उष्माघाताने राज्यात झालेल्या ३१ मृत्युपैकी विदर्भात २२ आणि एकट्या नागपुरात १६ मृत्यु हाेते.
- एकूण मृत्युमध्ये बाहेर काम करणाऱ्या २० ते ३९ वयाेगटातील पुरुषांची संख्या २९ हाेती.
- गेल्या वर्षी देशात उष्ण लाटेमुळे ११ हजार मृत्यु नाेंदविले आहेत.
- भारतातील ३०० शहरात उष्ण रात्रीचे प्रमाण ३२ टक्क्यांनी वाढले.
- उन्हाळ्यात हृदयराेगाने पीडित रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण ११ टक्क्यांनी वाढते.
- किडनी, फुफ्फूस व श्वसनाचे आजार वाढले. गर्भवतींमध्ये आराेग्याच्या समस्या येत आहेत.
- मानसिक आजार आणि गुन्ह्याचे प्रमाणही तापमान वाढीमुळे वाढल्याचे डाॅ. आवटे यांनी सांगितले.