नागपूर विभागाची रँक सुधारली पण टक्का घसरला; दहावीतही ठरल्या मुलीच वरचढ
By निशांत वानखेडे | Updated: May 8, 2026 17:26 IST2026-05-08T17:21:31+5:302026-05-08T17:26:54+5:30
Nagpur : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता १० वीचा निकाल शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. बारावीप्रमाणे दहावीतही नागपूर विभागाच्या निकालात घट झाली.

Nagpur division's rank improved but percentage dropped; Girls emerged as the top performers in 10th standard too
नागपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता १० वीचा निकाल शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. बारावीप्रमाणे दहावीतहीनागपूर विभागाच्या निकालात घट झाली. विभागाचा निकाल ८९.०७ टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात दीड टक्क्याची घट झाली आहे. मात्र यंदा एकूणच राज्याच्या निकालात २ टक्क्याची घट झाल्याने त्याचा लाभ मिळत रॅंकमध्ये नागपूर विभाग एक पायरी वर चढून ७ व्या स्थानी पाेहचला आहे.
विभागाच्या सहा जिल्ह्यातून यंदा १,४७,७८३ विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते, ज्यापैकी १,३१,६४५ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. बारावीप्रमाणे दहावीतही आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही निकालात मुली वरचढ ठरल्या आहेत. यंदा ७५,५२२ मुले प्रविष्ट झाले हाेते, ज्यामधून ६४,१९३ उत्तीर्ण झाले असून मुलांचे प्रमाण ८४.९९ टक्के आहे. दुसरीकडे प्रविष्ट झालेल्या ७१,२६१ मुलींपैकी ६७,४५२ म्हणजे ९३.३४ टक्के मुली यशस्वी झाल्या आहेत. त्यांचे प्रमाण मुलांपेक्षा ८.३५ टक्क्यांनी अधिक आहे.
नागपूर जिल्हा सर्वाेत्तम ९३.४४ टक्के
विभागाच्या सहा जिल्ह्यामध्ये निकालात नागपूर जिल्हा सर्वाेत्तम ठरला आहे. जिल्ह्यात २८,४६७ मुले आणि २७,९२१ मुली, असे एकूण ५६,३८८ विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते. त्यापैकी ५२,६९३ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. जिल्ह्यातही मुलींनीच बाजी मारली आहे. २५,८०७ मुले (९०.६५ टक्के) आणि २६,८८६ मुली (९६.२९ टक्के) उत्तीर्ण झाल्या. मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण ६.३६ टक्के अधिक आहे.
जिल्हानिहाय यशस्वीतांची स्थिती
जिल्हा प्रविष्ट उत्तीर्ण टक्के
नागपूर ५६,३८८ ५२,६९३ ९३.४४
गाेंदिया १८,८२५ १६,४९१ ८७.५८
चंद्रपूर २७,९४४ २४,४६७ ८७.५५
वर्धा १५,१५१ १३,२१८ ८७.२४
भंडारा १५,३९६ १३,२०७ ८५.७८
गडचिराेली १४,०७६ ११,५६९ ८२.१८
ताेतयेगिरी करणाऱ्या चाैघांना ५ परीक्षांची बंदी
काॅपीमुक्त अभियानाअंतर्गत कडक यंत्रणा राबविल्यानंतरही दहावीच्या परीक्षेत काॅपी करणाऱ्या ३२ विद्यार्थ्यांना पकडण्यात आले. या ३२ विद्यार्थ्यांची सुनावणी घेतल्यानंतर ज्या विषयात गैरप्रकार करताना सापडले, त्याची संपादणूक रद्द करून त्यांना नापास करण्यात आले. याशिवाय परीक्षेत स्वत:च्या जागी ताेतये व्यक्ती बसविण्याचा प्रकारही यावेळी घडला. गाेंदिया जिल्ह्यात अशी ताेतयेगिरी करणारे ४ विद्यार्थ्यांनी सापडले हाेते. त्या चारही विद्यार्थ्यांना यंदाची आणि पुढच्या ४ अंशा पाच परीक्षांवर बंदी घालण्याची कठाेर कारवाई बाेर्डाने केली आहे.
गुणपडताळणीसाठी २३ मे पर्यंत मुदत
निकालावर असमाधानी असलेले विद्यार्थी येत्या ९ मे पासून २३ मे पर्यंत गुणपडताळणीसाठी शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यांना पत्येक विषयासाठी ५० रुपये शुल्क भरावे लागेल. याच कालावधीत विद्यार्थी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीची देखील मागणी करू शकतात. त्यासाठी प्रति विषय ४०० रुपये शुल्क भरावे लागेल. छायाप्रती घेतल्यानंतर विद्यार्थी पुढच्या पाच कार्यालयीन दिवसांमध्ये उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात. यासाठी देखील प्रति विषय ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.