नागपुरकर एपीआय शिवाजी ननवरे यांनी धौलागिरी शिखर केले सर, ठरले राज्यातील पहिलेच पोलीस अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 00:58 IST2026-04-28T00:57:28+5:302026-04-28T00:58:04+5:30
धाडस, जिद्द आणि शौर्याचा नवा इतिहास...

नागपुरकर एपीआय शिवाजी ननवरे यांनी धौलागिरी शिखर केले सर, ठरले राज्यातील पहिलेच पोलीस अधिकारी
नागपूर : नागपूर शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी लक्ष्मण ननवरे यांनी गिर्यारोहण क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करत जगातील सातव्या क्रमांकाचे उंच आणि अत्यंत कठीण समजले जाणारे नेपाळमधील धौलागिरी शिखर यशस्वीरीत्या सर केले आहे. संबंधित शिखराची उंची ८,१६७ मीटर इतकी आहे. अशी कामगिरी करणारे महाराष्ट्र पोलीस दलातून ते पहिलेच अधिकारी ठरले आहे.
शिवाजी ननवरे यांनी यापूर्वीही जगातील अनेक उंच आणि आव्हानात्मक शिखरे सर करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. यामध्ये माउंट एव्हरेस्ट (८,८४८.८६ मीटर), माउंट लोहत्से (८,५१६ मीटर), माउंट मकालू (८,४८५ मीटर) आणि माउंट मनास्लू (८,१६३ मीटर) या शिखरांचा समावेश आहे. या सलग मोहिमांमुळे त्यांचे नाव भारतातील अग्रगण्य गिर्यारोहकांमध्ये घेतले जाते. धौलागिरी हे शिखर गिर्यारोहकांसाठी अत्यंत कठीण मानले जाते. तीव्र थंडी, कमी ऑक्सिजन, अनिश्चित हवामान, बर्फाचे वादळ यामुळे प्रत्येक पाऊल जीवघेणे ठरू शकते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही ननवरे यांनी अपार धैर्य, जिद्द आणि अचूक नियोजनाच्या जोरावर हे शिखर सर केले.
पोलिस सेवेत कार्यरत राहून एवढ्या उंचीवरील आणि धोकादायक शिखरावर विजय मिळवणे ही अतिशय दुर्मीळ आणि प्रेरणादायी कामगिरी मानली जाते. त्यांच्या या यशामुळे पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) राहुल माकणीकर, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील आणि पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांचे मार्गदर्शन लाभले.