नागपुरात खासगी रुग्णालयात कोरोना संक्रमित वेटिंगवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 07:00 AM2020-08-11T07:00:00+5:302020-08-11T07:00:16+5:30
सध्या शहरातील ६ खासगी रुग्णालयात २९६ बेड कोरोनाच्या रुग्णावर उपचारासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. सोमवारपर्यंत या रुग्णालयांमध्ये ९८ बेड रिकामे होते.
राजीव सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना पॉझिटिव्हच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारी रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयांनाही संक्रमितांवर उपचार करण्यास परवानगी दिली आहे. सध्या शहरातील ६ खासगी रुग्णालयात २९६ बेड कोरोनाच्या रुग्णावर उपचारासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. सोमवारपर्यंत या रुग्णालयांमध्ये ९८ बेड रिकामे होते. तरीसुद्धा कोरोनाचे रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी आल्यास त्यांना भरती करून घेण्यास टाळले जात आहे. रुग्णाने रुग्णालय सांगेल तेवढी फी भरावी व उपचार घ्यावेत यासाठी काही ठिकाणी रुग्णांना दिवसभर बसवून ठेवण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची चांगलीच अडचण होत आहे.
विशेष म्हणजे मनमानी फी वसूल करणे व नियमांचे पालन न केल्याप्रकरणी मनपा प्रशासनातर्फे वोक्हार्ट रुग्णालय व सेव्हन स्टार रुग्णालयावर आधीच कारवाई करण्यात आली आहे. तरीसुद्धा खासगी रुग्णालयांनी धडा घेतला नाही. नियमानुसार जेवढ्या खाटा कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी आरक्षित केल्या आहेत, त्यातील ८० टक्के रुग्णांकडून सरकारने ठरविलेल्या दरानुसार फी वसुली करायची आहे. उर्वरित २० टक्के खाटांवर रुग्णालय आपल्यास्तरावर शुल्क वसुली करू शकते. परंतु रुग्णालयात रुग्ण पोहचल्यानंतर बेड रिकामे नसल्याचे सांगण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात उत्तम सुविधा मिळेल, याच हेतूने रुग्ण जात आहेत. परंतु रुग्णालयांचा व्यवहार या आपत्तीच्या प्रसंगात रुग्णांसाठी वेदनादायी ठरत आहे. बहुतांश रुग्णालयात नियमांचे पालन करण्यात येत नसल्याचेही कळत आहे.
खासगी रुग्णालयातून येत असलेल्या तक्रारी लक्षात घेता, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अप्पर आयुक्त जलज शर्मा यांच्या नेतृत्वात विशेष पथक गठित केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात दररोज समीक्षा केली जात आहे. हे पथक कधीही रुग्णालयात पोहचून तपासणी करू शकते.
मनपाकडे करा तक्रार, कारवाई होईल - शर्मा
मनपा अप्पर आयुक्त व विशेष पथकाचे प्रमुख जलज शर्मा म्हणाले, खासगी रुग्णालयात रोज भरती होणाऱ्या रुग्णांची माहिती घेतली जात आहे. सरकारकडून दर निश्चित करण्यात आले आहे. त्यापेक्षा जास्त दर आकारल्यास कारवाई करण्यात येणार आहे. दोन रुग्णालयांवर कारवाई झाली आहे. जेथे रुग्णांना त्रास होत आहे, रुग्णालयांकडून जास्त बिल वसूल केले जात आहे, त्यांनी मनपाला तक्रार करावी.