करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 10:24 IST2026-04-16T10:23:16+5:302026-04-16T10:24:41+5:30
लग्नाच्या चर्चांवर काय म्हणाला करण कुंद्रा?

करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोडी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. सोशल मीडियापासून ते मनोरंजन विश्वापर्यंत सर्वत्र त्यांच्या लग्नाबद्दल नवनवीन दावे केले जातात. अनेकदा या दोघांनीही या अफवा फेटाळून लावल्या असल्या, तरी चाहत्यांमधील उत्सुकता कमी होत नाही. अशातच एका नव्या रिपोर्टने या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले असून, या जोडीने गुपचूप लग्न केल्याचा दावा केला जात आहे.
एका एंटरटेनमेंट पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, करण आणि तेजस्वीने 'सीक्रेट मॅरेज' केले आहे. ही बातमी समोर येताच 'X' (ट्विटर) सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकच चर्चा सुरु झाली. रिपोर्टमध्ये एका जवळच्या व्यक्तीचा हवाला देत म्हटले आहे की, सध्या सुरू असलेल्या चर्चा पूर्णपणे खऱ्या आहेत. यामुळे 'तेजरन'चे चाहते कमालीचे संभ्रमात पडले असून, काहींनी याला सत्य मानले आहे, तर काहींनी ही नेहमीप्रमाणे केवळ एक अफवा असल्याचे म्हटले आहे.
लग्नाच्या या वाढत्या चर्चांवर स्वतः करण कुंद्राने मौन सोडले असून सर्व दावे फेटाळून लावले आहेत. करण म्हणाला की, "गेल्या २-४ महिन्यांपासून हे सगळं सुरू आहे. कुठल्यातरी जुन्या स्क्रीनशॉटचा आधार घेऊन या अफवा पसरवल्या जात आहेत. माझ्याकडे ही बातमी आधीही आली होती." करणच्या या विधानावरून हे स्पष्ट झाले आहे की, तो या अफवांकडे गांभीर्याने पाहत नाही. तसेच तेजस्वीनेही लग्नावर भाष्य करताना म्हटले आहे की, "इतक्यात लग्नाचा प्लॅन नाही."
करण आणि तेजस्वी ही जोडी सध्या 'लाफ्टर शेफ्स सीझन ३' मध्ये एकत्र दिसत आहे. करण आणि तेजस्वीची प्रेमकहाणी 'बिग बॉस' च्या घरातून सुरू झाली होती हे सर्वांनाच ठाऊक आहे. सुरुवातीला त्यांच्यात केवळ मैत्री होती पण हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. शोमधील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली आणि बाहेर आल्यावरही हे नाते तितक्याच मजबुतीने टिकून राहिले. चाहत्यांनी या जोडीला 'तेजरन' हे नाव दिले असून आज त्यांची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग आहे.