'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 10:15 IST2026-04-16T09:37:10+5:302026-04-16T10:15:39+5:30
भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी केलेल्या टीकेला पूर्वेश सरनाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
Pratap Sarnaik VS Narendra Mehta: मिरा-भाईंदर शहराच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून भाजप विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष सुरु झाला आहे. काशीगाव मेट्रो परिसरातील जमिनीच्या वादावरून सुरू झालेला हा वाद आता थेट वैयक्तिक चिखलफेकीवर येऊन पोहोचला आहे. आमदार नरेंद्र मेहता यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याबद्दल केलेल्या एका खळबळजनक विधानामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पूर्वेश सरनाईक यांनी पत्राद्वारे मेहतांना संस्कारांची आठवण करून देत त्यांच्यावर टीका केली आहे.
काशीगाव मेट्रो स्थानक परिसरातील सुमारे ३० टक्के जमिनीवर आमदार नरेंद्र मेहता यांची मालकी असल्याचा दावा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला होता. या जमिनीमुळे मेट्रो स्टेशनचे काम रखडले असून प्रवाशांचे हाल होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. या आरोपांना उत्तर देताना नरेंद्र मेहता यांची जीभ घसरली. "प्रताप सरनाईकांच्या विधानाला गांभीर्याने घेऊ नका. जर खरंच माझ्याकडे ३० टक्के जमीन असती, तर सरनाईक माझे ड्रायव्हर असते. असं असतं तर प्रताप सरनाईकांना ५०० फुटावरून मला बोलावं लागलं असतं, ते माझ्या जवळ येऊ शकले नसते," मेहतांच्या या टीकेमुळे राजकीय वर्तुळात नवा वाद पेटवला आहे.
पूर्वेश सरनाईक यांचे पत्र
वडिलांबद्दल केलेल्या टीकेनंतर पूर्वेश सरनाईक यांनी नरेंद्र मेहतांना जाहीर पत्र लिहिले आहे. प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते हे विधान तुमच्या राजकीय संस्कारांचे प्रतिबिंब असून त्यातून तुमच्या व्यक्तिमत्वाची पातळी दिसून आली. राजकारणात वैचारिक मतभेद असू शकतात, पण चार वेळा निवडून आलेले आमदार आणि राज्याच्या मंत्र्याबद्दल बोलताना सभ्यता पाळणे गरजेचे असल्याचे पूर्वेश सरनाईक यांनी म्हटलं.
पूर्वेश सरनाईक यांनी पत्रात थेट इशारा दिला की, "आमच्याकडेही तुमच्या इनसाईड द टॉयलेट सारख्या प्रकरणांवर बोलण्याच्या अनेक संधी होत्या, पण आम्ही संस्कारांमुळे त्या पातळीवर गेलो नाही." तसेच जनतेने दिलेल्या कौलाचा आदर करून शहराच्या विकासावर लक्ष द्या, असा सल्ला देत आमचा संयम ही आमची कमजोरी समजू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे.