नागपुरात बावनकुळे ठरले भाजपच्या विजयरथाचे ‘कॅप्टन’; निवडणुकीअगोदरच पिंजून काढला होता जिल्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 13:05 IST2025-12-22T13:04:58+5:302025-12-22T13:05:28+5:30
शंभराहून अधिक लहानमोठ्या सभा

नागपुरात बावनकुळे ठरले भाजपच्या विजयरथाचे ‘कॅप्टन’; निवडणुकीअगोदरच पिंजून काढला होता जिल्हा
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात २२ नगराध्यक्ष निवडून आणत भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वर्षभरानंतरदेखील जिल्ह्यात जनाधार कायम राखण्यात पक्षाला यश आले. अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत या विजयाचे श्रेय महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात येत आहे. बावनकुळे यांनी प्रचार कालावधीत जिल्ह्यात शंभराहून अधिक लहानमोठ्या सभा घेतल्या. इतकेच नव्हे तर निवडणूक घोषित होण्याअगोदरच त्यांचा प्रचाराचा एक टप्पा आटोपला होता व त्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा त्यांनी पिंजून काढला होता.
विधानसभा निवडणुका झाल्यावर काही कालावधीतच बावनकुळे यांच्या यंत्रणेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या नियोजनाला सुरुवात केली होती. एकीकडे काँग्रेसमधील नेते तळागाळात जात नसल्याचे दिसून येत असताना, बावनकुळे यांनी दिवाळीअगोदरच प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात जागोजागी सभा घेतल्या होत्या. अगदी लहान सभेलादेखील ते आवर्जून पोहोचले. त्यानंतर दिवाळी मिलनाच्या माध्यमातूनही त्यांनी लहान गावांतदेखील जाऊन संवाद साधला. निवडणूक प्रचारकाळातही ते सातत्याने सक्रिय होते. बावनकुळे यांच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील ही निवडणूक अतिशय गंभीरतेने घेतली होती व त्यांनीदेखील प्रचारात सहभाग घेतला होता.
बेरीज-वजाबाकीमुळे विजयाचे ‘परफेक्ट गणित’
जिल्ह्यातील काही नगरपरिषदांमध्ये भाजपकडे हवे तेवढे सक्षम उमेदवार नव्हते. निवडणुकीत यश मिळविण्यासाठी काही जागांवर भाजपला ‘इनकमिंग’चा डाव खेळावा लागला. तेथील स्थानिक कार्यकर्ते नाराज होणार नाहीत, याची दक्षता बावनकुळे यांनी घेतली. त्यांच्या या बेरीज-वजाबाकीमुळे विजयाचे ‘परफेक्ट गणित’ जमविण्यात पक्षाला यश आले.
शहरालगतच्या परिसरावर जास्त भर
शहरालगतच्या नगरपरिषदांमध्ये अनेक नवीन मतदार होते. त्यांच्यापर्यंत पक्षाचा कार्यकर्ता किमान दोनदा पोहोचावा या दृष्टीने बावनकुळे यांनी निर्देश दिले होते. तसेच त्यांनी स्वत: मागील चार महिन्यांत अनेकदा भेटी देत सभा घेतल्या. कामठी, वाडी, डिगडोह देवी, वानाडोंगरी, महादुला, बहादुरा, बेसा पिपळा, गोधनी रेल्वे येथे भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले.
आमचा विकास, तर विरोधकांचा भकासाचा संकल्प
भाजपसाठी हा निश्चितच मोठा विजय आहे. आम्ही केवळ विकासाचेच राजकारण केले. इतर पक्षांनी कार्यकर्त्यांना सोडून दिले होते. मात्र आमच्यासाठी कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत व त्यांच्यासाठीच आमचे नेते प्रचारात उतरले होते. आमचा संकल्प विकासाचाच आहे, तर दुसरीकडे विरोधकांचा संकल्प भकासाचा आहे. आता ते ईव्हीएम, मतचोरी, मतदारयादीतील त्रुटी, सत्तेचा दुरुपयोग अशी कारणे देतील. मात्र जनतेला नेमके सत्य माहिती आहे व ते निकालांतून दिसून आले आहे.
- चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री