४४ आॅटो जप्त : मीटर जाम असलेल्यांकडून वसूल केला दंडनागपूर : उपराजधानीत प्रवासी घेऊन धावणारे ९,६३८ आॅटोरिक्षा आहेत. यातील बहुसंख्य आॅटोरिक्षांवर इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात आले आहेत, परंतु बोटावर मोजण्याइतके आॅटोरिक्षा सोडल्यास मीटरने चालायला तयार नाहीत. याची गंभीर दखल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेताच, गुरुवारी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने ५५ आॅटोरिक्षांवर कारवाई करीत ४४ आॅटो जप्त केले.आरटीओ कार्यालयाने १ सप्टेंबर २०१४ पासून आॅटो मीटरनेच चालण्याची सक्ती केली होती. वचक बसावा म्हणून विशेष मोहिमेंतर्गंत १५०० वर आॅटोंवर कारवाई करण्यात आली. दरम्यानच्या काळात वाढलेले पेट्रोलचे दर लक्षात घेऊन आॅटोरिक्षाच्या भाडेदरातही वाढ केली. परंतु बहुसंख्य आॅटो मीटरने चालायलाच तयार नसल्याचे चित्र आहे. विशेषत: रेल्वे स्थानकावर प्रवाशांची लुट सुरू आहे. पालकमंत्री बावनकुळे यांच्याकडे या तक्रारी येताच त्यांनी जानेवारी महिन्यात अधिकाऱ्यांची बैठक बोलवून आढावा घेतला. आरटीओ कार्यालयाने विशेष पथक नेमून बुधवारी कारवाईला सुरुवातही केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरटीओने ११५ वाहने तपासली. यातील ५५ आॅटोरिक्षा मीटरने चालत नसल्याचे आढळून आले. या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सोबतच ४४ आॅटोमध्ये इतर गंभीर त्रुटी आढळून आल्याने ते जप्तही करण्यात आले. (प्रतिनिधी)
५५ आॅटोरिक्षांवर आरटीओची कारवाई
By admin | Published: February 12, 2016 3:26 AM