"रांगड्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही", राज ठाकरेंना संताप अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 18:45 IST2026-01-31T18:42:40+5:302026-01-31T18:45:15+5:30
Raj Thackeray on Praful Patel NCP: अजित पवारांच्या निधनापासूनच राजकीय पटलवार वेगाने घडामोडी घडण्यास सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या अध्यक्षपदाचीही चर्चा सुरू झाली. या सगळ्यांवर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

"रांगड्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही", राज ठाकरेंना संताप अनावर
Raj Thackeray News: अजित पवारांची राख सावडण्यात आली, त्याच दिवशी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होणार याचा निर्णय झाला. त्यानंतर शनिवारीच तातडीने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली, त्यात सुनेत्रा पवारांची गटनेते पदी निवड करून शपथविधी पार पडला. या सगळ्या घडामोडींवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल पटेल यांच्या नावाची चर्चा आहे, त्यावरूनच राज ठाकरेंनी थेट हल्ला केला.
सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडल्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. राज ठाकरेंनी गेल्या दोन दिवसांपासून प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्याकडून ऐन सूतकाच्या काळात सुरू असलेल्या भेटीगाठींवर टीका केली.
"जे सुरूये त्यावर बोलावंच लागेल"
राज ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल", अशा शब्दात राज ठाकरेंनी सुनावले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रफुल पटेल इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावरही राज ठाकरेंनी रोखठोक शब्दात भूमिका मांडली आहे.
राज ठाकरे प्रफुल पटेलांबद्दल काय बोलले?
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही", असे म्हणत राज ठाकरे यांनी थेट प्रफुल पटेल यांच्यावरच हल्ला केला आहे.
अमोल मिटकरीही म्हणाले, दुर्लक्ष झालं तर दुसरेच राज्य करतात
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी एक महत्त्वाचं आणि मोठं विधान केले. त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर भूमिका मांडली.
आमदार अमोल मिटकरी भूमिका मांडताना म्हणाले की, "दोन्ही पक्ष एकत्र यावे अशी माझीही इच्छा आहे. पक्ष एकत्र असायलाच हवा. शरद पवार आणि आम्ही एकत्र असायलाच हवे. पक्ष एकत्र असला म्हणजे दुसरे लोक पक्षात घुसखोरी करणार नाहीत. एवढेच नाही तर स्वराज्य दुर्लक्षित झालं, तर दुसरेच येऊन राज्य करतात", असे विधान त्यांनी केले.