हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड संतापले; "संभाजीराजे नव्हे तर संभाजी, शाहूंच्या विचारांचा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 17:25 IST2024-08-01T17:21:04+5:302024-08-01T17:25:25+5:30

आजपर्यंत माझ्या गाडीपर्यंत येऊन हल्ला करण्याचं कुणी धाडस केली नाही. मी गाडी थांबवली पण ते उलटे पळून गेले असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी संभाजीराजेंवर पुन्हा जोरदार टीका केली. 

NCP MLA Jitendra Awhad the first reaction after the car attack, Targeted on Yuvraj Sambhaji Raje | हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड संतापले; "संभाजीराजे नव्हे तर संभाजी, शाहूंच्या विचारांचा..."

हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड संतापले; "संभाजीराजे नव्हे तर संभाजी, शाहूंच्या विचारांचा..."

ठाणे - संभाजीराजे नाही तर संभाजींची चूकच होती, त्यांच्यामुळे विशालगडावर जे काही झाले त्यांच्याआड झालं. त्यांची भूमिका योग्य नव्हती. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांशी सुसंगत नव्हती हे मी आजही बोलतोय. एका हल्ल्याने मी घाबरणारा माणूस नाही. ड्रायव्हरनं गाडी थांबवून यूटर्न घेईपर्यंत हल्लेखोर पळाले असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या वाहनावरील झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली त्याचसोबत संभाजीराजे छत्रपती यांच्यावर निशाणा साधला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राजर्षी शाहू महाराजांचे जे रक्त होते ते सर्वांना बरोबर घेऊन जाणारे होते. भांडणं लावणारं रक्त नव्हते असा त्याचा अर्थ होता. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा १ टक्काही या संभाजींराजेंकडे नाही. जातीजातीत, धर्माधर्मात भांडण लावणारे शाहू महाराजांचे वंशज कसे होतील? ज्यांनी दगड मारलाय त्यांना माझी कारवाई व्यवस्थित समजावून सांगेन असं सांगत आव्हाडांनी सूचक इशारा दिला. 

तसेच माझं अंग गरम झालंय, हा भयानक हल्ला वैगेरे नव्हता. परंतु माझ्या गाडीवर आजपर्यंत कुणाची चालून येण्याची हिंमत नव्हती. मागून काय दगड मारता, समोर येऊन मारायचा ना XXX...मला कायदेशीर कारवाईमध्ये काही रस नाही माझी मी कारवाई करेन. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार, राजर्षी शाहू यांचे विचार यांच्याशी गद्दारी संभाजीने केली असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी त्यांचा राग व्यक्त केला. 

दरम्यान, त्यांनी त्यांचं काम केले, आम्ही आमचं काम करू. आम्ही धर्मनिरपेक्षता ठरवलीय ती पाळणार.. गजापूरला जाऊन संभाजीकडून विचारपूस करण्याची अपेक्षा होती. मात्र याच्या वागण्यामुळे आम्ही राजवाड्यावर येणार नाही असा निरोप तिथल्या लोकांनी पाठवला. आजचे खासदार शाहू छत्रपती हे स्वत: गजापूरला गेले, तिथे ३ तास त्यांच्याशी बोलले. कोल्हापूरनगरी पुरोगामित्वासाठी ओळखली जाते. संविधानाचं मूळ फुले शाहू आहेत. त्यांच्या वारसानं दंगल घडवण्यासाठी पुढाकार घेणं हे न शोभणारं आहे.  माफी मी मलो तरी मागणार नाही. त्यांची माफी मागितली पाहिजे, त्यांच्यामुळे एक मशिद पडली. माझी लढाई ही विचारांची आहे. विशालगडावर ते आरोपी आहेत असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. 

Web Title: NCP MLA Jitendra Awhad the first reaction after the car attack, Targeted on Yuvraj Sambhaji Raje