मविआला मिळणार एकच जागा, शिंदेसेनेच्या वाट्याला दोन जागा, नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी मिळणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 11:38 IST2026-04-17T11:37:25+5:302026-04-17T11:38:35+5:30
Vidhan Parishad Election 2026: विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता महाविकास आघाडीतील तीन पक्षांना मिळून एकच जागा विधान परिषदेत निवडून आणता येणार आहे. २०२० मध्ये या नऊ जागांसाठी निवडणूक झाली तेव्हा उद्धव ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते.

मविआला मिळणार एकच जागा, शिंदेसेनेच्या वाट्याला दोन जागा, नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी मिळणार का?
मुंबई - विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता महाविकास आघाडीतील तीन पक्षांना मिळून एकच जागा विधान परिषदेत निवडून आणता येणार आहे. २०२० मध्ये या नऊ जागांसाठी निवडणूक झाली तेव्हा उद्धव ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत आमदार होणे अनिवार्य होते. तेव्हाच नऊ जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली.
भाजपचे ४, एकत्रित शिवसेनेचे दोन, एकत्रित राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचे एक आमदार निवडून गेले होते. यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धवसेना व राष्ट्रवादी (शरद पवार) या तीन पक्षांना मिळून एकच जागा मिळेल. शरद पवार गटाला राज्यसभा जागा आधीच मिळाली आहे.
राज्यसभेला आम्ही शरद पवारांच्या पाठीशी राहिलो आता पवार गट आणि उद्धवसेना यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आणि दुसरीकडे ही जागा उद्धव ठाकरेंसाठीच सोडावी अशी भूमिका घेतली गेली तर मविआत पेच निर्माण होईल.
दादाराव केचे, केणेकर आणि संदीप जोशी यांना केवळ १४ महिन्यांसाठीच मिळाली आमदारकी
भाजपचे दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी या तीन आमदारांना केवळ १४ महिन्यांचाच कार्यकाळ मिळाला. आता त्यांच्यापैकी कोणाला पुन्हा संधी मिळेल हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
१४ मे २०२० रोजी बिनविरोध जिंकलेल्या भाजपच्या चार आमदारांपैकी तिघे म्हणजे प्रवीण दटके (मध्य नागपूर), रमेश कराड (लातूर ग्रामीण) आणि गोपीचंद पडळकर (जत) हे नोव्हेंबर २०२४ मध्ये विधानसभेवर निवडून गेले. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर दादाराव केचे, संदीप जोशी आणि संजय केणेकर यांना संधी मिळाली पण आमदारकीचा १४ महिन्यांचाच कार्यकाळ त्यांना मिळाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए राहिलेले सुमित वानखेडे यांना आर्वीमधून भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली. तेव्हा तिथले भाजप आमदार दादाराव केचे यांनी ‘आपण लढणारच’ असे जाहीर केले.
तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर दिवे हे केचेंना घेऊन विशेष विमानाने अहमदाबादला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. असे म्हणतात की शाह यांनी केचेंना आदेश दिला की तुम्ही विधानसभा लढू नका, तुमची काळजी मी स्वत: करेन. नंतर १४ महिन्यांची विधान परिषद आमदारकी देत केचेंचे पुनर्वसन करण्यात आले.
सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा करून संदीप जोशी यांनी गेल्या जानेवारीमध्ये खळबळ उडवून दिली होती. ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात.
संजय केणेकर छत्रपती संभाजीनगरमध्ये तीनवेळा नगरसेवक तर एकवेळा उपमहापौर होते. ३८ वर्षांपासून भाजपचे कार्यकर्ते आहेत. गेल्यावेळी
भाजपकडून आमदार झालेले रणजितसिंह मोहिते पाटील यांना पूर्ण सहा वर्षांचा कार्यकाळ मिळाला. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींमध्ये ते भाजपपासून दुरावले.
शिंदेसेनेकडून कोण?
शिंदेसेनेच्या वाट्याला दोन जागा जातील. गेल्यावेळी एकत्रित शिवसेनेकडून जिंकलेल्या आणि बंडामध्ये एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत आहे.
शिंदे हे त्यांना संधी देतील का आणि दिली तर दुसरा उमेदवार कोण याबाबत चर्चा होत आहे. पक्षात दहा ते बारा प्रबळ दावेदार आहेत. अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी की अन्य कोणी याबाबतही उत्सुकता आहे.