Vidhan Sabha 2019: मनसेला लढण्याची आताच आहे संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 04:33 AM2019-09-17T04:33:46+5:302019-09-17T04:34:10+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- अजून लोकांना त्यांच्यावर विश्वास आहे का, अशा प्रश्नांची उत्तरे या निवडणुकीत मिळतील.

Maharashtra Vidhan Sabha 2019: Now is the chance to fight election MNS | Vidhan Sabha 2019: मनसेला लढण्याची आताच आहे संधी

Vidhan Sabha 2019: मनसेला लढण्याची आताच आहे संधी

Next

- रवींद्र मांजरेकर

राज ठाकरे यांची मुलुख मैदान तोफ उमेदवारांच्या सोबतीला असेलच. विरोधी मतांची फाटाफूट होईल, याची चिंता करण्याचे मनसेला कारण नाही. राज्यात या पक्षाची काय स्थिती आहे, अजून लोकांना त्यांच्यावर विश्वास आहे का, अशा प्रश्नांची उत्तरे या निवडणुकीत मिळतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक लढवायची की नाही याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. शिवाय निर्णय काय होईल हे ठाउक नसल्याने आता अस्वस्थताही आहे. या नेत्यांनी बैठकीत नेहमीप्रमाणे निर्णय घेण्याची जबाबदारी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टाकली. पण गेल्या काही दिवसात ते काहीच बोललेले नाहीत. त्यांच्या मौनाची कारणे त्यांनाच माहिती. मात्र त्यांना निर्णय तर तातडीने घ्यावाच लागेल.
गेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी निवडणूक न लढवता मोदी सरकारच्या विरोधात मोजक्याच प्रचार सभा घेऊन हवा तयार केली. त्याचा काही परिणाम मतदारांवर झाल्याचे निकालात दिसले नाही. त्याउलट मोदी सरकारचीच जोरदार सरशी झाली. केंद्र सरकारच्या विरोधात उपस्थित केलेले मुद्दे, सरकारकडून दिली दिशाभूल करणारी आकडेवारी, धोरणातील दुटप्पीपणा हे ठाकरे यांनी लोकांना उच्चरवात सांगितले खरे. पण मतदारांनी ते सगळे नाकारले. त्या सगळ्यापेक्षा सरकारने किंवा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सांगितले त्यावरच मतदारांनी विश्वास ठेवला. सरकारची विश्वासार्हता ही त्या सगळ््या आरोपांपेक्षा जास्त प्रभावशाली ठरली. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेली मेहनत वाया गेली.
मतदान झाल्यावर मनसेने इतर विरोधी पक्षांसोबत इव्हीएमचा मुद्दा हाती घेतला. त्या विरोधात मोर्चा काढण्याचे जाहीर केले. पण आधी महाराष्ट्रात आलेल्या पूरस्थितीमुळे आणि नंतर खुद्द ठाकरे यांच्या ईडी चौकशी नाट्यामुळे तो मोर्चा मागे पडला. आता प्रश्न आला तो विधानसभा निवडणुकांचा. त्यावर पक्षात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींना पक्षाने ही निवडणूक लढवावी असे वाटते, तर काहींनी ईव्हीएमवर मतदान होणार असेल तर निवडणूक लढवू नये असे मतप्रदर्शन केले आहे.


खरेतर मनसेने ही निवडणूक लढायलाच हवी. लोकशाही प्रक्रियेत निवडणूक हे कार्यकर्ते प्रशिक्षणासाठी सगळ््यात महत्त्वाचे साधन आहे. त्यापासून कार्यकर्त्यांना असे वारंवार वंचित ठेवणे हा त्यांच्यावर अन्याय आहे.
वास्तविक, कमीत कमी पैशात, स्थानिक कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन, पद्धतशीरपणे प्रचाराचे अभियान राबवून मनसेला ही निवडणूक लढता येईल. स्थानिक प्रश्न विस्ताराने मांडता येतील. युती आणि आघाडीची राजकीय समीकरणे लोकांना पुन्हा उलगडून दाखवता येतील. विधानसभेच्या एकेका मतदारसंघात एक ते पाच हजार मतांनी फरक पडतो. हे लक्षात घेतले आणि पक्षाला मिळालेल्या मतांचा अभ्यास केल्यास निवडणूक लढण्याची मानसिकता तयार होऊ शकेल.
आताही न लढण्याचा निर्णय झाला, तर मग २०२२मध्ये होणाºया मुंबई- ठाणे महापालिका निवडणुकांपर्यंत मनसेला वाट पाहावी लागेल. त्यासाठीही कार्यकर्त्यांना तयार करायचे असेल, तळापासून पक्ष संघटनेची बांधणी करायची असेल, तर मनसेला ही निवडणूक लढवावीच लागेल.
न लढण्याचा निर्णय घेतल्यास आधीच सैरभैर झालेल्या पक्षाला सावरणे आणखी कठीण होईल. शिवाय, मनसे निवडणुका न लढणारा पक्ष ही प्रतिमा आणखी गडद होईल.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019: Now is the chance to fight election MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.