26 Mar, 26 08:58 PM
मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर जयशंकर आणि फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये खलबतं!
एस. जयशंकर यांनी मध्यपूर्वेतील सध्याच्या तणावावर चर्चा करण्यासाठी फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली, ज्यामध्ये बदलत्या परिस्थितीवर आणि तिच्या जागतिक परिणामांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
26 Mar, 26 06:48 PM
पंतप्रधान मोदी उद्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार; मध्य-पूर्वतील संघर्षाबाबत चर्चा!
मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, २७ मार्च रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार असून, यामध्ये युद्धाचा भारतावर होणारा परिणाम आणि राज्यांची सज्जता यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
26 Mar, 26 06:28 PM
शेत व पाणंद रस्ते अडवणाऱ्यांविरोधात होणार कठोर कारवाई
शेत व पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किंवा रस्त्याचे नुकसान करणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली असून अशा व्यक्तींचे आधार कार्ड आणि फार्मर आय-डी तब्बल ५ वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे संबंधित व्यक्ती शासनाच्या विविध योजना आणि मदतीसाठी अपात्र ठरणार आहे. "मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने"च्या अंमलबजावणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्णय घेतला. महसूल विभागाने या बाबतचा आदेश जारी केला.
26 Mar, 26 05:43 PM
नागपूरच्या रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत मुख्यमंत्री सहभागी
प्रभू श्रीरामांच्या या पवित्र रामनवमीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. प्रभू श्रीरामांनी आपल्याला भारतीय जीवनशैलीसाठी नेहमीच आदर्श शिकवले आहेत आणि तेच आदर्श पुढे नेण्यासाठी आपण हा सण साजरा करतो. दरवर्षी आम्ही या भव्य मिरवणुकीत सहभागी होतो. हा उत्साह दरवर्षी वाढत आहे. त्यात लोकांचा सहभागही वाढत आहे असं नागपूर येथे आयोजित मिरवणुकीत सहभाग घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केली.
26 Mar, 26 05:13 PM
“जो राम का है, वो काम का है” आमदार संजय केनेकर यांचे वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय केनेकर यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. “जो राम का है, वो काम का है, जो राम का नाही तो काम का नाही,” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना संजय केनेकर यांनी सांगितले की, २०१४ पासून देशात हिंदू संस्कृतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील नेतृत्वाच्या माध्यमातून राम मंदिर तसेच काशी विश्वनाथ धामासारख्या धार्मिक स्थळांच्या विकासाला गती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
26 Mar, 26 04:14 PM
लष्करातील शौर्य पदक विजेत्या जवानाच्या कुटुंबाला आयुष्यभर रेल्वे प्रवास मोफत
भारत सरकारने एक शासन निर्णय काढला आहे. या निर्णयानुसार भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलामध्ये सेवा करत असताना ज्या जवानांचा शौर्य पदकाने सन्मान होईल, त्याला, त्यांच्या पत्नीला (शहीद जवानांची पत्नी असेल, तर दुसरे लग्न होईपर्यंत), अविवाहित असेल, तर त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईवडिलांना भारतीय रेल्वेमध्ये प्रथम श्रेणी, २ एसी किंवा एसी चेअर डब्ब्यातून आयुष्यभर प्रवास मोफत असेल, अशी माहिती संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.
26 Mar, 26 04:16 PM
परळीतही रामराज्य यावं मंत्री पंकजा मुंडेंचे विधान
बीड जिल्ह्यातील परळी शहरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र या उत्सवात मंत्री पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.परळीतील काळाराम मंदिरात राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पारंपरिक पद्धतीने राम जन्म सोहळा साजरा करत त्यांनी पाळणा हलवून श्रीराम जन्माचा क्षण अनुभवला.जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. हजारो भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित होते.यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “परळीतही रामराज्य यावं.” तसेच राम जन्मोत्सवात सहभागी होणं हे आपलं भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
26 Mar, 26 03:31 PM
जिल्ह्यात विरोधक दुबळे झालेत, आणि राजू शेट्टींनी केलेले आरोप खोटे आहेत - निलेश राणे
मीडियाच्या काही रिपोर्टवर लोकं पॅनिक होतात. प्रत्येक पेट्रोल पंपची एक कपॅसिटी असते रोजची. त्या कपॅसिटीच्या बाहेर जर तुम्ही गेलात तर त्या रांगा दिसणार तुम्हाला. मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. बातम्या बघून लोकं पॅनिक होतायत. ज्याची ७५ टक्के टाकी फुल आहे तो पण फुल करायला जातोय, म्हणून त्या रांगा दिसतायत. त्यामध्ये पॅनिक व्हायचे कारण नाही. कुठेही शॉर्टेज आम्ही येऊ देणार नाही. प्रशासन सातत्याने संपर्कात आहे. जे एजंट आहेत, प्रायव्हेट असतील किंवा गव्हर्नमेंटचे, त्या सर्वांशी आमचं बोलणं चालू आहे. कुठेही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शॉर्टेज येऊ देणार नाही.
26 Mar, 26 01:07 PM
गोंदियात हत्तींची दहशत; पिकांचे नुकसान वाढले, नियंत्रणासाठी कोलकात्याहून पथक दाखल
गडचिरोली जिल्ह्यातील गोंदिया जिल्ह्यात 32 हत्तींचा कळप दाखल झाले असून याच्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव तालुक्यातील वडेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात मका पिकाचे नुकसान झाले या 32 हत्तीच्या कडपाचे दहशत परिसरात पसरली असून त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता कोलकत्ता वरून एक पथक बोलण्यात आले आहे. या पथकाचे सदस्याने शेतकऱ्यांनी देखील धैर्याने राहायला पाहिजे वाघ बिबट आणि हत्ती माणूस सगळेच एकत्रित राहतील मात्र जनहानी होऊ नये यासाठी प्रयत्न करायला पाहिजे शेतकऱ्यांनी देखील शेतात जाताना काळजी घ्यायला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले आहे.
26 Mar, 26 01:05 PM
शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप
शीतल म्हात्रे यांनी अशोक खरात प्रकरणावरून आरोप करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे शीतल म्हात्रे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. "क्रूरकर्मा खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे… यही तो नही “ताज” का राज ? उबाठाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे… ‘ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल …" असं म्हणत म्हात्रे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच खरात_फाइल्स हा हॅशटॅग वापरला आहे. वाचा सविस्तर
26 Mar, 26 11:31 AM
भोंदू अशोक खरातने अंनिसला दिलेली धमकी
सध्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या विषयी पीडित महिलांच्या तक्रारी दाखल होत असून त्या व्यतिरिक्त अनेकांनी आपल्या धमक्या दिल्याच्या तक्रारीही केल्या आहेत. आता महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने देखील खरातने हे प्रकरण उघड करण्यासाठी सुमारे वीस वर्षापूर्वी धमक्या दिल्या होत्या, असा दावा केला आहे. वाचा सविस्तर
26 Mar, 26 11:08 AM
खरातने थेट तुर्कस्थानातून मागवलं ९० लाखांचं फर्निचर
नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील मिरगावामध्ये भोंदूबाबा अशोक खरात याने उभारलेल्या आलिशान टोलेजंग अशा फार्महाउसमध्ये फर्निचर थेट तुर्कस्थानातून मागवून लावण्यात आलं आहे. यासाठी पुण्याचे बांधकाम व्यावसायिक फिर्यादी राजेंद्र जासूद यांना तब्बल ९० लाख रूपये खर्च करण्यास बाबाने भाग पाडल्याचं त्यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. फार्महाउस बांधकामासह इंटेरिअर आणि फर्निचरसाठी तब्बल अडीच कोटी रूपये भोंदू खरातने त्यांच्याकडून उकळले आहे. वाचा सविस्तर
26 Mar, 26 10:49 AM
भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड
स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या नाशिकच्याअशोक खरात ऊर्फ भोंदू बाबाच्या पापाचा घडा आता भरला आहे. दररोज या बाबाच्या काळ्या कारनाम्यांचे नवे पदर समोर येत असून, अंधश्रद्धेचा बाजार मांडून त्याने एका भक्ताला चक्क २१ देशांची वारी घडवून आणली आणि त्याच्याच पैशावर आपली चैन भागवल्याचे उघड झाले आहे. विशेष तपास पथकाकडून सुरू असलेल्या चौकशीत आता अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या ऐकून सगळ्यांच डोकं चक्रावून गेलंय.
26 Mar, 26 10:39 AM
लोणावळ्याजवळ पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी; प्रवाशांचे प्रचंड हाल
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर लोणावळ्याजवळ आज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या विलंबाचा सामना करावा लागत आहे. घाट सेक्शनमध्ये वाहनांचा वेग कमालीचा मंदावला असून, अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सुट्ट्यांमुळे किंवा इतर कारणांमुळे वाढलेल्या गर्दीचा फटका प्रवाशांना बसत आहे.
26 Mar, 26 10:31 AM
एफ १८ फायटर जेट पाडलं, व्हिडिओ दाखवत इराणचा दावा
मध्यपूर्वेतील धुमसता संघर्ष आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने अमेरिकेचे अत्यंत शक्तीशाली मानले जाणारे F-18 फायटर जेट क्षेपणास्त्राने पाडल्याचा खळबळजनक दावा केला होता. विशेष म्हणजे, या दाव्याला पुष्टी देण्यासाठी इराणने एक व्हिडिओ देखील जारी केला. मात्र, अमेरिकेने इराणचा हा दावा साफ फेटाळून लावत, ही केवळ फेक न्यूज असल्याचे म्हटले आहे.
26 Mar, 26 10:28 AM
जगासाठी होर्मुजचा मार्ग बंद, भारतासाठी खुला!
मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक तेल पुरवठ्याची जीवनवाहिनी समजली जाणारी होर्मुजची सामुद्रधुनी इराणने शत्रू राष्ट्रांसाठी बंद केली असतानाच, भारतासाठी मात्र आनंदाची बातमी समोर आली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी गुरुवारी स्पष्ट केले की, भारत हा इराणच्या ५ सर्वात जवळच्या मित्र देशांपैकी एक असून भारतीय जहाजांना या मार्गावरून सुरक्षित प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
26 Mar, 26 10:23 AM
आंध्र प्रदेशात बस आणि डंपरची भीषण धडक
आंध्र प्रदेशातील मार्कापुरमजवळ एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला असून, यात किमान ८ प्रवाशांचा जागीच जिवंत जळून मृत्यू झाला आहे. रायवरम येथील एका स्लॅब क्वारीजवळ भरधाव बस आणि खडीने भरलेल्या डंपरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेनंतर काही सेकंदातच बसला भीषण आग लागली, ज्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.
26 Mar, 26 10:18 AM
अमरावती पोलीस आयुक्तालयात क्युआरटी जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गुरुवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. आयुक्तालयात कार्यरत असलेल्या शीघ्र कृती दलाच्या एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून घेऊन जीवनयात्रा संपवली. विजय नागापुरे असे मृत जवानाचे नाव असून, या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.