अनगाव : घराला लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची घटना तालुक्यातील सोनटक्के गावात घडली. भीषण आग आटोक्यात आणण्यात भिवंडी अग्निशामक दलाच्या जवानांना दोन तास लागले. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी दुंदाराम शेलार या शेतकर्याच्या घरातील किमती वस्तू जळाल्याने सव्वासात लाखांचे नुकसान झाले आहे. यात नुकत्याच लग्न झालेल्या मुलीस आहेर मिळालेल्या दागदागिन्यांसह इतर वस्तूंचा समावेश आहे. दुंदाराम यांचा दुग्ध व्यवसाय आहे. पावसाळा तोंडावर आल्याने त्यांनी गुरांसाठी लागणारा गवत-पेंढा घरात साठवून ठेवला होता. शुक्रवारी मध्यरात्री १२.३०च्या सुमारास अचानक त्या पेंढ्यांना आग लागली. आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती आटोक्यात येत नाही म्हणून अग्निशामक दलास बोलावण्यात आले. त्यांनी आग आटोक्यात आणेपर्यंत घरातील अन्नधान्य, कपडे, किमती वस्तूंसह १२ मे रोजी मुलीच्या विवाहात तिला नातेवाइकांनी दिलेल्या वस्तूंमध्ये १२ तोळे सोने वितळले, तर ६५ हजारांची रक्कम यात जळून खाक झाली. या प्रकरणी कवाड तलाठी आर. बी. घागस यांनी पंचनामा करून सात लाख २२ हजार १०० रुपये इतके नुकसान झाल्याचा अहवाल तहसीलदारांना पाठवला आहे. आगीचे कारण समजले नाही. पावसाळा तोंडावर आला असताना ही घटना घडल्याने आणि कर्ज घेऊन मुलीचा विवाह केल्याने त्यांचे कुटुंब बेघर झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच कवाड ग्रामपंचायतीच्या सरपंच अलका दुमाडा यांनी भेट देऊन शेलार कुटुंबीयांचे सांत्वन करून पंचायतीमार्फत मदत करण्याचे आश्वासन दिले. सोबत शिवसेनेचे तालुका सचिव राजेंद्र काबाडी व दीपक दुमाडा होते. (वार्ताहर)
घराला लागलेल्या आगीत सव्वासात लाखांचे नुकसान
By admin | Updated: May 25, 2014 01:13 IST