अलमट्टीपेक्षा हिप्परगीची उंची जास्त, मग सांगली, कोल्हापूरला धोका कसा; लक्ष्मण सवदींचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 13:52 IST2025-07-05T13:52:04+5:302025-07-05T13:52:41+5:30
उंची वाढविण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण, कर्नाटकवर खापर फोडण्याचा प्रयत्न

अलमट्टीपेक्षा हिप्परगीची उंची जास्त, मग सांगली, कोल्हापूरला धोका कसा; लक्ष्मण सवदींचा सवाल
अथणी (कर्नाटक) : अलमट्टी धरणापेक्षा हिप्परगी बॅरेजची उंची जास्त आहे. अलमट्टी भरले, तरी हिप्परगी बॅरेज पाण्याखाली जात नाही. या स्थितीत अलमट्टीमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत महापूर येतो हे थोतांड आहे. सांगली, कोल्हापूरच्या राजकारण्यांनी व अधिकाऱ्यांनी विनाकारण गोंधळ व गैरसमज निर्माण करू नयेत, असे आवाहन कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले.
अथणी येथे संपर्क कार्यालयातील पत्रकार बैठकीत सवदी बोलत होते. ते म्हणाले, अलमट्टीची उंची ५२४ मीटर केल्यास त्याचा परिणाम सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांवर होत नाही. हिप्परगी बॅरेजची उंची अलमट्टीपेक्षाही २ मीटरने जास्त म्हणजे ५२६ मीटर आहे. अलमट्टी पूर्ण क्षमतेने भरले, तरी हिप्परगी बॅरेज पाण्याखाली जात नाही. या स्थितीत अलमट्टी भरल्यावर सांगली, कोल्हापुरात महापूर येतो असे कसे म्हणता येईल? या बाबतीत महाराष्ट्र सरकार व लोकप्रतिनिधी विनाकारण गोंधळ करून घेत आहेत. अलमट्टी आणि हिप्परगी बॅरेजच्या उंचीची त्यांनी माहिती करून घ्यावी आणि मगच अलमट्टीविरोधात तक्रार करावी.
उंची वाढविण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण
सवदी म्हणाले, सध्या अलमट्टी धरण ५१९ मीटर उंच आहे. उंची ५२४ मीटर करण्यासाशाळेच्या इमारतीसाठी निधी द्यावाठी सर्व तांत्रिक व प्रशासकीय बाबींची पूर्तता झाली आहे. आता फक्त गेट बसविण्याचेच काम शिल्लक आहे. उंची वाढीनंतर कर्नाटक शासन १ लाख ३० हजार एकर जमीन संपादित करणार आहे. त्यामध्ये ७२ हजार एकर जमीन पाण्याखाली बुडणार असून उर्वरित जमिनीवर धरणग्रस्तांचे पुनर्वसन केले जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना एकूण ६५ हजार कोटी रुपयांची भरपाई देणार आहोत. या प्रक्रियेला अगोदरच विलंब झाला आहे. आता पुढची पावले गतीने उचलणार आहोत.