तात्काळ मंत्रिगट स्थापन करा, वरिष्ठ मंत्र्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 04:56 IST2020-04-07T04:56:09+5:302020-04-07T04:56:28+5:30

राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने पक्षाच्या नेत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे.

Establish urgent ministers committee, demand of senior ministers hrb | तात्काळ मंत्रिगट स्थापन करा, वरिष्ठ मंत्र्यांची मागणी

तात्काळ मंत्रिगट स्थापन करा, वरिष्ठ मंत्र्यांची मागणी

अतुल कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील कारोनाचा फैलाव अनेक जिल्ह्यांमधील परिस्थिती आणि मंत्रालयातून होणारे निर्णय यांचा ताळमेळ बसेनासा झाला आहे. त्यामुळे तातडीने कोरोना निवारण मंत्रीगटाची स्थापना करा किंवा आहे त्या मंत्रीगटाला रोजच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी करुन घ्या, अशी मागणी वरिष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे उद्या मंगळवारी मुख्यमंत्री इतर मंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स करणार आहेत.


राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने पक्षाच्या नेत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. आज सगळे निर्णय ठराविक अधिकारी घेत आहेत, त्यातही अधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. उद्या जर परिस्थिती बिघडली तर हेच अधिकारी हात वर करतील आणि मंत्री व राजकीय नेते म्हणून आपल्याला उत्तरे देत बसावे लागेल. ती वेळ येऊ द्यायची नसेल तर तातडीने मंत्रीगट स्थापन करुन त्यांच्यासोबत सतत बैठका घ्याव्या लागतील, त्यांच्याकडून ह्यग्राऊंड रिएलिटीह्ण समजून घ्यावी लागेल त्याशिवाय परिस्थिती नियंत्रणात येणार नाही असेही त्या मंत्र्याने स्पष्ट केले.


सरकार स्थापन झाले त्यावेळी राष्टÑवादीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, तर शिवसेनेमधून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री सुभाष देसाई तर काँग्रेसमधून प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली. कमिान या समितीची बैठक व्हायला हवी, मंत्रीगट नाही तरी या सहाजणांची समिती करुन ती कार्यान्वित करण्याची व त्यांचा रोजच्या निर्णयप्रक्रीयेत सहभाग होणे गरजेचे आहे असे काही मंत्र्यांचे म्हणणे आहे.


याबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही सगळे मंत्री एकमेकांच्या संपर्कात आहोतच, मुख्यमंत्री ठाकरे स्वत: आमच्याशी दिवसातून दोनवेळा बोलत असतात. परंतु असा मंत्रीगट असायला हवा. त्यामुळे रोजच्या कामकाजात सुसुत्रता येणे सोपे होते. उद्या आम्हा मंत्र्यांची एक बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सवर होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचेही थोरात म्हणाले. अनेक एनजीओ आणि सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, नेते या संकटाच्या वेळी रस्त्यावर उतरुन लोकांना मदत करत आहेत, भुकेलेल्यांना अन्न देत आहेत. मात्र हा लढा १४ तारखेपुरता मर्यादित नाही. त्यामुळे त्यांनी देखील हा लढा पुढे काही दिवस चालू ठेवण्याची मानसिकता करण्याची गरज असल्याचेही थोरात यांनी स्पष्ट केले.


नर्सेस, वॉर्डबॉयना प्रशिक्षण द्या
कोरोनाचे रुग्ण कसे हाताळायचे, त्यासाठी कोणते मास्क कोणत्या ठिकाणी घालायचे याची माहिती जरी डॉक्टर्स आणि अन्य लोकांना दिलेली असली तरी शेवटच्या टप्प्यापर्यंत मृत रुग्णाचे शरीर कसे हाताळायचे, त्यासाठी या व्यवस्थेतल्या शेवटच्या घटकापर्यंत ही माहिती व प्रशिक्षण झालेले नाही, ते तातडीने करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्याचे आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

Web Title: Establish urgent ministers committee, demand of senior ministers hrb