हे स्थगिती नव्हे, प्रगती सरकार; सभागृहात या, पायऱ्यांवर आंदोलन नको- एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 23:18 IST2026-02-22T23:15:12+5:302026-02-22T23:18:06+5:30
Eknath Shinde Maharashtra Budget 2026: विकासकामांची यादी वाचून दाखवत विरोधकांच्या टीकेला उत्तर

हे स्थगिती नव्हे, प्रगती सरकार; सभागृहात या, पायऱ्यांवर आंदोलन नको- एकनाथ शिंदे
Eknath Shinde Maharashtra Budget 2026: साडेतीन वर्षात महायुती सरकारने खूप काम केले आहे. दावोस मध्ये झालेले ३० लाख कोटींचे औद्योगिक करार, त्यातून ४० ते ५० लाख रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात पायाभूत सुविधांवर सुमारे एक लाख कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. एमएमआरडीएच्या वतीने ४६ हजार कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईला वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी बीकेसी–कुर्ला ७० किमी टनेल, बोरिवली–ठाणे टनेल आणि मुलुंड टनेल प्रकल्प राबवले जात आहेत. त्यामुळे राज्याची सर्व क्षेत्रात प्रगती सुरू आहे. हे स्थगिती सरकार नसून, प्रगती सरकार आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संख्या, पद महत्त्वाचे नसते...
अधिवेशनापूर्वीच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी टाकलेल्या बहिष्कारावर टीका करत शिंदे म्हणाले, "अर्थसंकल्पीय अधिवेशन हे केवळ सत्ताधाऱ्यांचे नसून विरोधकांनी सभागृहात येऊन प्रश्न विचारावेत. पायऱ्यांवर आंदोलन करण्यापेक्षा चर्चेत सहभागी व्हावे. विरोधी पक्षनेते, सभापती व अध्यक्ष पदाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, जनतेने जेवढी संख्या दिली नाही त्याची खंत सभागृहाबाहेर आंदोलन करून भरून निघणार नाही; संख्या किंवा पद महत्त्वाचे नसून आत्मविश्वास महत्त्वाचा असतो."
दोषींना पाठीशी घालणार नाही
"दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय समिटचा संदर्भ देत त्यांनी देशाची बदनामी करण्याच्या कृतींवरही टीका केली. देशात आणि परदेशात पंतप्रधानांची व भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न देशप्रेम नसल्याचे त्यांनी म्हटले आणि अधिवेशनात अशा प्रकारचे प्रकार घडू नयेत. एमएमआरडीएच्या कामांदरम्यान घडलेल्या दुर्घटनेबाबत बोलताना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे, संबंधित कंपनीला ५ कोटी रुपये व सल्लागाराला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे सांगितले. चार जणांना अटक करण्यात आली असून सेफ्टी व स्ट्रक्चर ऑडिटचे आदेश देण्यात आले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी व एमएमआरडीएमार्फत प्रत्येकी १५ लाख रुपयांची मदत देण्यात आहे. कोणालाही पाठीशी घालणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
शेतकऱ्यांसाठीही सरकारचा मोठा निर्णय
"सिंचन क्षेत्रात १२५ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे सांगत सुमारे ९० हजार कोटींची मंजुरी दिल्याचे त्यांनी नमूद केले. मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी तसेच विदर्भाला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. पोशिर, शिरवाड आणि काळू धरणांसाठीही निधी मंजूर केला आहे. शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्याचे सांगत एनडीआरएफचे निकष दोन हेक्टरवरून तीन हेक्टरपर्यंत वाढवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्यांना मदत देण्यात आली असून दिवसा वीज पुरवठ्याचा निर्णयही सरकारने घेतला," असे त्यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजना...
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवर विरोधकांनी टीका करून न्यायालयात धाव घेतल्याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, ४५ हजार कोटींचा मोठा आर्थिक भार असूनही योजना यशस्वीपणे सुरू केली. “आम्ही घोषणा करून विसरणारे नाही; जे बोलतो ते करून दाखवतो. औद्योगिक गुंतवणुकीबाबत बोलताना त्यांनी दिल्लीतील समिटमध्ये रिलायन्स इंडस्ट्रिज समूहाने एआय क्षेत्रात १० लाख कोटींची गुंतवणूक जाहीर केल्याचे नमूद केले. उद्योगपतींना सुरक्षा व प्रोत्साहन देणे आवश्यक असून पूर्वी त्यांच्या घराबाहेर काय प्रकार होत होते हे सर्वांना माहिती आहे," असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.