'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 10:22 IST2026-04-30T10:22:18+5:302026-04-30T10:22:54+5:30
Keshav Upadhye News: पुढच्या काही दिवसांत होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाने पाच उमेदवारांची आपली यादी नुकतीच प्रसिद्ध केली. तसेच दीर्घकाळ भाजपाचं प्रवक्तेपद सांभाळणारे माधव भंडारी आणि केशव उपाध्ये या ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एकदा आमदारकीने हुलकावणी दिली होती.

'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
पुढच्या काही दिवसांत होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाने पाच उमेदवारांची आपली यादी नुकतीच प्रसिद्ध केली. तसेच दीर्घकाळ भाजपाचं प्रवक्तेपद सांभाळणारे माधव भंडारी आणि केशव उपाध्ये या ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एकदा आमदारकीने हुलकावणी दिल्याचे स्पष्ट झाले. बरीच वर्षे पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडून भाजपाला योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना संधी नाकारण्यात आल्याने विरोधकांकडून भाजपाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे. सोबतच केशव उपाध्ये आणि माधव भांडारी यांच्यावरही खोचक टीका होत आहे. त्याला आता केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावरून उत्तर दिलं आहे.
विधान परिषदेच्या आमदारकीची संधी हुकल्याच्या पार्श्वभूमीवर केशव उपाध्ये यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ''की घेतले न हे व्रत अंधतेने…” असे लिहून शेअर केलेल्या पोस्टमध्ये केशव उपाध्ये यांनी लिहिले की, २५-३० वर्षांपूर्वी विचारधारेचे काम सुरू करताना कुठे, काय, कोण, कधी होणार याचा कधीही विचार केला नव्हता. प्रखर राष्ट्रवादाची भावना आणि सकारात्मक काम करण्याची जिद्द, यातूनच या प्रवासाला सुरुवात झाली आणि पाहता पाहता २५-३० वर्षे कधी निघून गेली ते कळलेच नाही. ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत राहिलो. अनेक प्रसंग आले आणि मग अशा वेळी अटल बिहारी वाजपेयी नेहमी ज्यांची कविता सांगायचे त्या शिवमंगल सिंह सुमन यांच्या ओळी कायम प्रेरणा देत राहिल्या.
“संघर्ष पथ पर जो मिले, यह भी सही… वह भी सही…”
हीच एका खऱ्या कार्यकर्त्याची भूमिका असते… आणि तीच भूमिका आजही कायम आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी संधी मिळालेल्या उमेदवारांचं अभिनंदन करताना उपाध्ये यांनी लिहिले की, परवा सायंकाळी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाले. हे सर्व सहकारीच आहेत. त्यामुळे मनापासून आनंद झाला. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार तसेच संजय भेंडे आणि विवेक कोल्हे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! बाकी, मला ट्रोल करण्यात, ‘सतरंजी उचले’ म्हणण्यात ज्यांना आनंद मिळतो, तो त्यांनी जरूर घ्यावा. त्यांनाही मनापासून शुभेच्छा!, असा टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.