आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाने यंदाच्या हंगामात विजयासह सुरुवात केली. १३ वर्षांनी विजयी सलामी दिल्यावर MI पुन्हा जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेत अधिराज्य गाजवेल, असे वाटत होते. पण IPL २०२६ स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील आठव्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सवर सहाव्या पराभवाची नामुष्की ओढावली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहितलाही लपवता आली नाही निराशा
जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ड या वर्ल्ड क्लास गोलंदाजांनी भ्रमनिरास केल्यामुळे रायन रिकल्टन आणि विल जॅक्सच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर २४३ धावांचा डोंगर उभारूनही MI पराभवाचा सामना करावा लागला. गोलंदाजीतील निराशजनक कामगिरीनंतर MI च्या डगआउटमध्ये बसलेला 'मुंबईचा राजा' आणि MI ला पाचवेळा चॅम्पियन करणारा माजी कर्णधार रोहित निराश झाल्याचे पाहायला मिळाले. एका बाजूला हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना संघाच्या पराभवानंतर रोहित शर्माच्या चेहऱ्यावर दिसलेले भाव खूप काही सांगून जाणारे होते.
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
MI च्या चाहत्यांच्या मनात अजूनही तोच कॅप्टन
रोहित शर्मा दुखापतीमुळे सध्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नसला तरी त्याची उपस्थिती प्रत्येक सामन्यात मुंबई इंडियन्सच्या डगआउटमध्ये प्रकर्षाने जाणवते. यंदाच्या हंगामात तो आणखी काही सामने मुकणार असला तरी संघाशी असलेलं त्याचं नातं अजूनही तितकंच घट्ट दिसतं. मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची वाताहत डोळ्यासमोर पाहताना ‘मुंबईचा राजा’ भावूक झाल्याचे चित्र चाहत्यांच्या नजरेत भरणारे आहे. कर्णधारपद नसतानाही संघाबद्दलची त्याच्या मनातील तळमळ आणि जिव्हाळा स्पष्ट दिसून आला. तो सध्याच्या घडीला नेतृत्व करत नसतानाही रोहित शर्माच आजही MI चाहत्यांच्या मनात खऱ्या कर्णधाराच्या स्थानावर कायम का आहे त्याचे उत्तरही पुन्हा एकदा मिळाले.
MI च्या ताफ्यातील उलथापालथ
रोहित शर्मा हा टीम इंडियासह आयपीएलमधील एक सर्वोत्तम आणि यशस्वी कर्णधार राहिला आहे. पण २०२४ च्या हंगामाआधी MI च्या ताफ्यात मोठी उलथापालथ झाली. गुजरात टायटन्सला पदार्पणात ट्रॉफी जिंकून देणाऱ्या हार्दिक पांड्याला पुन्हा आपल्या ताफ्यात सामील करताना मुंबई इंडियन्सने थेट नेतृत्वाची धुरा त्याच्याकडे सोपवली. या निर्णयानंतर हार्दिक पांड्याला रोषाचा सामनाही करावा लागला. २०२४ च्या हंगामात भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यावर हार्दिक पांड्याबद्दल जी काही उलट सुलट चर्चा रंगली ती थांबली. गत हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाने प्लेऑफ्सपर्यंत मजलही मारली. पण आता पुन्हा एकदा रोहितच कॅप्टन असायला हवा होता, अशी भावना मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मनातही दाटून आली तर त्यात नवल वाटण्याजोगे काहीच नाही.