गॅस, इंधन पुरवठ्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका; म्हणाले, “PM मोदी...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 15:41 IST2026-03-12T15:39:50+5:302026-03-12T15:41:44+5:30
Deputy CM Eknath Shinde News: गॅसचा तुटवडा होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

गॅस, इंधन पुरवठ्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका; म्हणाले, “PM मोदी...”
Deputy CM Eknath Shinde News: अमेरिका-इराण युद्धामुळे देशभरात गंभीर गॅस टंचाई निर्माण झाली असून, देशभरात गॅस सिलिंडरसाठी सर्वसामान्य नागरिकांनी भर उन्हात रांगा लावल्या. पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक, कोल्हापूरमध्ये गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी सकाळपासूनच रांग लावली होती. सिलिंडर संपल्याने राज्यातील ४० टक्के हॉटेल्स बंद पडले असून, काही हॉटेलचालकांवर चूल पेटवण्याची वेळ आली. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली.
केंद्र सरकारने मात्र देशात एलपीजी सिलिंडरची कोणतीही कमतरता नसून ग्राहकांनी घाबरून जाऊन आगाऊ बुकिंग करण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर काळ्या बाजारात ४ ते ५ हजारावर पोहोचला आहे. अनेक हॉटेल्सनी आपल्या मेन्यू कार्डमध्ये बदल करण्यास सुरुवात केली असून, कमी गॅस लागणाऱ्या पदार्थांवर भर दिला जात आहे.
अफवा पसरवू नका
पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, गॅस, इंधन पुरवठ्याबाबत केंद्र सरकार अतिशय बारकाईने आणि गांभीर्याने लक्ष देत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. गॅसचा तुटवडा होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गॅस पुरवठा आणि तुटवड्यासंदर्भात भूमिका मांडली. काही लोक अफवा पसरवत आहेत, पण कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. कुणीही अफवा पसरवू नये. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, घरगुती एलपीजीचा पुरवठा सध्या अडीच दिवसांच्या सामान्य पातळीवर स्थिर आहे. चुकीच्या माहितीमुळे काही ठिकाणी साठेबाजीचे प्रकार समोर येत आहेत, मात्र सरकार त्यावर लक्ष ठेवून असून, राज्य सरकारांना काळाबाजार रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारी प्रयत्नांमुळे एलपीजी उत्पादनात सुमारे २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. पुढच्या काही दिवसांत एलएनजीचे दोन मोठे टैंकर भारतात पोहोचणार असून, यामुळे एलपीजी टंचाई कमी होईल, असे पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटले आहे.