२०२८ च्या राज्यसभा, विधान परिषदेच्या आशेवर काँग्रेसची निवडणुकीतून माघार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 08:28 IST2026-05-01T08:27:37+5:302026-05-01T08:28:32+5:30
शिंदेसेनेच्या खेळीने भाजपची डोकेदुखी, अजित पवार गटाकडून मुंबईत मुस्लीम चेहरा

२०२८ च्या राज्यसभा, विधान परिषदेच्या आशेवर काँग्रेसची निवडणुकीतून माघार
मुंबई - उद्धवसेनेने चर्चा न करताच अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्याने संतप्त होत शड्डू ठोकत आम्ही विधान परिषद निवडणूक लढवणारच, असे सांगणाऱ्या काँग्रेसने यू-टर्न घेत गुरुवारी माघार घेतली. २०२८ मध्ये विधान परिषद आणि राज्यसभेची प्रत्येकी एक जागा देण्याची मागणी काँग्रेसने केली. मात्र, विधान परिषदेची जागा देण्याचे आश्वासन उद्धवसेनेने दिले. त्यानंतर माघार घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
उद्धवसेनेच्या शिष्टमंडळाने काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज न भरण्याची विनंती केली. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी फोनवर चर्चा केली. २०२८ मध्ये विधान परिषदेच्या १०, मुंबई स्थानिक मतदारसंघाच्या दोन जागा आणि राज्यसभेचीही निवडणूक होणार आहे. काँग्रेसने यापैकी दोन जागांची मागणी केली आहे. उद्धवसेनेच्या वतीने विधान परिषदेची जागा देण्याचे मान्य करण्यात आले. त्यानंतर सपकाळ यांनी काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांना दूरध्वनीवरून याची माहिती दिली. त्यांच्याकडून हिरवा कंदील आल्यानंतर राज्यातील नेत्यांशी चर्चा करून त्यानंतर काँग्रेसच्या दानवे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिंदेसेनेकडून शेवटच्या क्षणी कडू, गोऱ्हे यांची नावे
प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी शिंदेसेनेत प्रवेश करीत विधान परिषदेची आमदारकी पदरात पाडून घेतली. एका आमदारकीसाठी पक्ष विलीन करायला मी नालायक नाही, अशी बुधवारी भूमिका मांडणाऱ्या कडू यांनी गुरुवारी शिंदेसेनेत प्रवेश केला. प्रहार संघटना पुढेही स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून कार्यरत राहील, असे कडू यांनी जाहीर केले. कडू यांच्यासह माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. गोऱ्हे यांना सलग पाचव्यांदा विधान परिषदेवर जाण्याची यामुळे संधी मिळाली आहे. अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीला अवघे दोन तास शिल्लक असताना त्यांनी गोऱ्हे यांच्या नावाची घोषणा केली.
विदर्भात महायुतीचे समीकरण बदलणार
अमरावती : ‘रस्त्यावरचा लढवय्या’ म्हणून ओळख असलेले प्रहार जनशक्ती संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी शिंदेसेनेत केलेला प्रवेश विदर्भात शिंदेसेनेला नवी उभारी देणारा मानला जात आहे.
शिंदेसेनेच्या खेळीने भाजपची डोकेदुखी वाढणार
महायुतीमधील हा अंतर्गत बदल भाजप नेत्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. बच्चू कडूंच्या रूपाने मतदारसंघात पुन्हा एक समांतर सत्ताकेंद्र निर्माण झाल्याने, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीत ‘तुझं-माझं’ होणे अटळ मानले जात आहे.
अजित पवार गटाकडून मुंबईत मुस्लीम चेहरा
अजित पवार गटाने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मराठा आणि ओबीसी इच्छुकांना डावलत मुस्लीम समाजाचे माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचे नाव निश्चित केले. झिशान हे हत्या झालेले माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आहेत. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर २०२४ च्या विधानसभेला त्यांचा पराभव झाला होता. पक्षांतर्गत वादातून नवाब मलिक यांना शह देण्यासाठी झिशान यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे, तसेच झिशान यांचा बॉलिवूडमध्ये दांडगा संपर्क असून ते पार्थ पवार यांचे जवळचे मित्रही आहेत.