“अमेरिकबरोबरच्या व्यापारी करारामुळे भारतातील शेतकरी देशोधडीला लागणार”: हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 00:10 IST2026-05-05T00:09:05+5:302026-05-05T00:10:32+5:30
Congress Harshwardhan Sapkal: शिव, शाहु, फुले व आंबेडकरांचा महाराष्ट्र कोणाला बदलू देणार नाही, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

“अमेरिकबरोबरच्या व्यापारी करारामुळे भारतातील शेतकरी देशोधडीला लागणार”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal:काँग्रेस आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत केली जात होती. शेतकरी कर्जमाफी करण्यात आली. कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवली तरी काँग्रेस सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जात परंतु २०१४ पासून केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आल्यापासून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. शेतमालाला भाव नाही. त्याला सर्वस्वी नरेंद्र व देवेंद्र यांचे सरकारच जबाबदार आहे, असा निशाणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी साधला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आज बुलढाणा जिल्ह्यातील मानेगाव ते जळगाव जामोद अशी शिवसन्मान शेतकरी संघर्ष पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेच्या सांगता सभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली. शेतकऱ्याच्या सोयाबीन, कापूस, कांदा, तूर, हरभरा, धानाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल आहे, एकीकडे आस्मानी संकट तर दुसरीकडे सुलतानी संकटात तो अडकला आहे आणि देशातील व राज्यातील भाजपा सरकार मात्र शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्लॅकमेल करत आहेत, मोदी अमेरिकेसमोर सरेंडर झाले आहेत. त्यातूनच अमेरिकेबरोबर नरेंद्र मोदींनी दबावाखाली व्यापारी करार केला, त्याचा मोठा परिणाम भारतातील शेतकऱ्यांवर होणार आहे. या करारामुळे भारतातील शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळणार नाही आणि शेतकरी देशोधडीला लागेल, हे पाप भाजपा सरकारने केले आहे. तर काँग्रेस पक्षाने मात्र शेतकऱ्यासाठी संघर्षाची भूमिका घेतली आहे, बळीराजाचे राज्य आणेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार सपकाळ यांनी केला.
शिव, शाहु, फुले व आंबेडकरांचा महाराष्ट्र कोणाला बदलू देणार नाही
भाजपा व संघ परिवारातील लोक सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करत आहेत. छत्रपतींचा इतिहास विकृत करण्याचे काम केले जात आहे गोलवलकर, सावरकर यांच्यापासून भगतसिंह कोश्यारी, राहुल सोलापूरकर, कोरटकर यांच्यासारख्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला पण त्यांच्यावर कारवाई मात्र केली नाही. पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास विरोध करणारे संघ विचाराचे लोक होते, सावित्रीबाईंनाही याच विचाराने विरोध केला. परंतु प्राण गेला तरी शिव, शाहु, फुले व आंबेडकरांचा महाराष्ट्र कोणाला बदलू देणार नाही, असा इशारा सपकाळ यांनी दिला.
दरम्यान, पाच राज्याच्या निवडणुकीचे निकालानंतर भाजपाने महाराष्ट्रात फटाके फोडून विजयाचा जल्लोष केला. राज्यात शेतकरी संकटात आहे, महिलांवर अत्याचार होत असताना फटाके फोडून जल्लोष करताना भाजपाला लाज कशी वाटत नाही, असा संतप्त सवाल करत ममता बॅनर्जींना पराभूत करण्यासाठी भाजपाने सर्वशक्ती पणाला लावली. निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्टही मैदानात उतरले आणि सर्वांनी मिळून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव केला, अशी टीका सपकाळ यांनी केली.