ऑनलाइन अभ्याक्रमावर शाळांचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:18 AM2021-04-13T04:18:15+5:302021-04-13T04:18:15+5:30
वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई मोहीम लातूर : शहर वाहतूक शाखेच्या वतीने कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या वाहनाच्या विरोधात कडक कारवाई मोहीम ...
वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई मोहीम
लातूर : शहर वाहतूक शाखेच्या वतीने कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या वाहनाच्या विरोधात कडक कारवाई मोहीम राबविली जात आहे. शहरातील दयानंद गेट परिसर, पाच नंबर चौक, गंजगोलाई, गांधी चौक, रेणापूर नाका, औसा रोड आदी भागांत स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात येत आहे. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. या मोहिमेला अधिक गती दिली जाणार असल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले.
शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात
लातूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यासाठी बालरक्षकांची स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती. त्यानुसार जवळपास ७०हून अधिक शाळाबाह्य मुले सापडली असून, शिक्षण विभागाच्या वतीने या मुलांना जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत.
प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक नागरिक बाहेर जाताना मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी उपाययोजनांचे पालन करीत नसल्याचे चित्र आहे. त्यानुसार मनपाच्या वतीने नियमांचे पालन न करणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्स आदी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दुभाजकात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले
लातुर : शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजकात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने नियमित कचरा संकलन केले जात आहे. तसेच दुभाजकाची स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. अनेक नागरिक दुभाजकात कचरा टाकत असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. मनपाच्या वतीने शहरातील विविध भागांत कचराकुंडी बसविण्यात आली असून, त्यातच कचरा टाकण्याचे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने चाचण्यांवर भर
लातूर : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या बाधित रुग्णाच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तपासणी केली जात आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होमआयसोलेशनचा पर्याय दिला जात असून, जिल्ह्यातील बहुतांश रुग्ण होमआयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने स्वतंत्र नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन
लातूर : जिल्हा कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे. दोन महिन्यांनंतर खरीप हंगामाला प्रारंभ होणार असून, त्यानुसार बियाणे, खतांचे नियोजन शेतकऱ्यांच्या वतीने केले जात आहे. जिल्ह्यात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा होत असल्याने स्वतःकडील बियाणांचा पेरणीसाठी वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.