भरदुपारी शेतात राबताना शेतकऱ्याचा जीव गेला; लातूरमध्ये उन्हाच्या झळांनी घेतला चौथा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 16:44 IST2026-04-29T16:35:10+5:302026-04-29T16:44:40+5:30

पानचिंचोली येथील शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज अपयशी; लातूर जिल्ह्यात उन्हाची लाट तीव्र.

Heatwave Death Toll Rises to 4 in Latur; 75-Year-Old Farmer Dies in Nilanga while working in field | भरदुपारी शेतात राबताना शेतकऱ्याचा जीव गेला; लातूरमध्ये उन्हाच्या झळांनी घेतला चौथा बळी

भरदुपारी शेतात राबताना शेतकऱ्याचा जीव गेला; लातूरमध्ये उन्हाच्या झळांनी घेतला चौथा बळी

लातूर/निलंगा : उन्हाचा तडाखा रौद्ररूप धारण करत असून, उष्माघाताने आणखी एका शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे मंगळवारी दुपारी स्वत:च्या शेतात जनावरांसाठी चारा कापत असताना त्र्यंबक नारायण बेळंबे (वय ७५ ) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. उष्माघाताने झालेला हा लातूर जिल्ह्यातील चौथा बळी आहे.

पानचिंचोली येथील त्र्यंबक बेळंबे हे मंगळवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शेतात जनावरांसाठी चारा कापत होते. यावेळी उन्हाची तीव्रता प्रचंड होती. चारा जनावरांना दिल्यानंतर त्यांनी पाणी पिले आणि त्यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. नातेवाइकांनी त्यांना तातडीने पानचिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. उन्हाच्या तीव्रतेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे.

लातूर जिल्ह्यातील मृतांची संख्या चार
लातूर जिल्ह्याचा पारा ४० ते ४१ अंशांवर आहे. वाढत्या तापमानाने आतापर्यंत चार जणांचे बळी घेतले आहेत. औसा तालुक्यातील गोंद्री येथे एका नऊ महिन्यांच्या चिमुरडीचा उष्माघाताने मृत्यू झाला. एरंडीत एका २५ वर्षीय तरुणाचा बळी गेला. औराद शहाजानी (ता. निलंगा) येथेही एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर मंगळवारी पानचिंचोली (ता. निलंगा) त्र्यंबक बेळंबे यांचा झालेला मृत्यू ही चौथी घटना ठरली आहे. दरम्यान, बेळंबे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

प्रशासनाचे आवाहन
दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, कष्टाची कामे सकाळी १० वाजेच्या आत आणि सायंकाळी ५.३० वाजेनंतर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नये, घरामध्ये खेळती हवा राहावी, उन्हात जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे.

Web Title : लातूर में लू से किसान की मौत; चौथा मामला दर्ज

Web Summary : लातूर में चारा काटते समय लू लगने से एक किसान की मौत हो गई, जिससे जिले में गर्मी से होने वाली मौतों की संख्या चार हो गई है। प्रशासन ने सावधानी बरतने की सलाह दी है।

Web Title : Heatwave Claims Farmer's Life in Latur; Fourth Death Reported

Web Summary : A farmer in Latur died of heatstroke while cutting fodder, marking the fourth heat-related death in the district. Authorities urge precautions during peak hours.